वसई : नायगाव जवळील उमेळा गावात तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. स्थानिकांनी तिघांना रंगेहाथ पकडून दिले असतांनाही पोलिसांनी नोटीस बजावून त्यांना सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उमेळा येथे तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात असल्याची तक्रार नगरसेवक मनीष वर्तक यांनी तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे केल्यानंतर पाटोळे यांनी मंडळ अधिकारी दादाराव जाधव यांना घटनास्थळी जाऊ पंचनामा करण्याचे आदेश दिले. जाधव घटनास्थळी पोचले असता. त्याठिकाणी मशिनच्या सहाय्याने तिवरांची झाडे तोडली जात असल्याचे आढळून आले. स्थानिकांनी तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. गोविंद ससाणे (बदलापूर), माधव मिश्रा (नालासोपारा), सूर्यकांत घरत , गोविंद घरत (कळंब) यांच्या मालकीच्या जागेत तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंडळ अधिकारी जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर सोमनाथ ससाणे, जगदीश निसाद, राज कनोजिया यांच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना तिघांनाही नोटीस बजावून सोडून दिले. (प्रतिनिधी)
वसईत तिवरांची कत्तल
By admin | Updated: April 12, 2016 00:28 IST