- शौकत शेखडहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयातील प्रकल्पाधिकारी व सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे ११ नोव्हेंबरपासून रजेवर असल्याने येथील कारभार जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते एक दिवसही येथे आले नसल्याने, येथील लाभार्थ्यांचे हाल सुरू झाले आहेत.गेल्या अकरा दिवसांपासून डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डहाणू, पालघर, तलासरी, वसई तालुक्यातील, आश्रमशाळा, निवासी वसतिगृहे, अनुदानित शाळा, महाविद्यालय आणि ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत, विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांची २५ कोटींची बिले मंजुरीविना पडून राहिलेली आहेत. तसेच विकासकामे मंजूर असूनही ठप्प झाली आहेत तर खाजगी आश्रमशाळा, वसतिगृहे यांच्या इमारतीच्या भाड्याबरोबरच निवासी वसतिगृहांचे आहार बिल थकले आहे.गेल्या तीन-चार वर्षापासून स्वतंत्र सनदी अधिकाºयाची प्रकल्पाधिकारी म्हणून नेमणूक न करता डहाणू येथील सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा पदभार सोपविण्यात आल्यामुळे, त्यांना दोन्हीकडची कामे उरकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत ३५ आश्रमशाळा, १७ शासकीय निवासी वसतिगृहे आणि अनुदानित विद्यालय असून, त्यात सुमारे २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय जिल्हाभरातील ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत होणारे, रस्ते, पूल, साकव, अंगणवाड्या इमारती आणि घरकुलांच्या लाभार्थ्यांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कटियार हे दोन डिसेंबर रोजी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातून येणा-या नागरिकांना कामाविना हात हलवत परत जावे लागत आहे.डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा प्रकल्पाधिकारीपदाचा पदभार हा जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिका-यांकडे सोपविण्यात आला आहे, ते येऊन येथील कामकाज पाहतात.- एस .एम.मते,सहायक प्रकल्पाधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा कारभार रामभरोसे; लाभार्थ्यांचे हाल, अधिकारी रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:10 IST