वसई : वहिवाटीचा रस्ता बंद करून निर्माण झालेल्या वादावर अखेर चाणक्य नगरीतील नागरिकांनी पडदा टाकला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील चाणक्य नगरीतील कनोज आणि बोधगया या सोसायटीच्या मधील रस्ताबंद करून या सोसायट्यांनी त्या ठिकाणी लोखंडी गेट उभारला होता. त्यामुळे समेळ पाड्याला वळसा घालून उज्जयनी सोसायटीतील लोकांना आपली वाहने हाकावी लागत होती. त्यात रुग्ण,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात परवड होत होती. जवळचा मार्ग बंद झाल्यामुळे महापालिकेचे सफाई, कामगार, गॅसवाले, पोस्टमन, कुरिअरचे, हॉटेलचे डिलीव्हरी बॉईज उज्जयनीकडे फिरकत नव्हते. त्यामुळे अनेक संकटांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. हा मार्ग खुला करण्यासाठी स्थानीक नगरसेवक,पोलीस ठाणे आणि महापालिकेकडे साकडेही घालण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाकडे या सर्वांनी दुर्लक्ष केले होते. रस्ता महापालिकेला हस्तांतरीत केला होता. त्याठिकाणी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसवला होता. पण, रस्ता बंद केल्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील महिलांनी उपोषण आंदोलन सुुरु करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कनोज आणि बोधगया सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येवून हा गेट काढून टाकला. त्यामुळे उज्जयनी सोसायटीतील रहिवाशांनी या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी बोधगयाचे सेके्रटरी विजय अहिरे,कनोजचे रामचंद्र गवळी,उज्जयनीचे अरुण मुळीक, चाणक्यनगरी फेडरेशनचे नितीन पेंढारी आणि नालासोपारा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक सुहास कांबळे यांनी पुढाकार घेवून येथील रहिवाशांची समजूत काढली. त्यामुळेच हे प्रकरण निवळून वादावर पडदा पडला. (प्रतिनिधी)
चाणक्य नगरीचे गेट अखेर उघडले
By admin | Updated: February 13, 2017 04:46 IST