डहाणू/बोर्डी : वन विभागांतर्गत नरपड आणि चिखले या समुद्रकिनाऱ्यालगतच्या सुरूंच्या बागेला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. ती लागली की लावली याबद्दल संशय व्यक्त होतो आहे. डहाणू व बोर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व अकार्यक्षमतेमुळे सुरूच्या बागांना, धोका पोहचत असल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे. जोरदार वारे आणि भरतीच्या लाटांच्या तडाख्यापासून किनाऱ्याची धूप नियंत्रित करण्यासाठी वन विभागाने सुरू झाडांची लागवड केली आहे. धूप प्रतिबंधासह या गर्द हिरव्या सुरू बागांनी परिसर नयनरम्य बनला असून तो पर्यटकांना भुरळ घालत आहे. मात्र काही अविवेकी पर्यटक आणि मद्यपी यांनी गैरवर्तनाने सुरूंच्या बागांना आग लागण्याचे प्रसंग उद्भवून झाडांचे नुकसान होत आहे. तर कचरा, प्लॅस्टिक पिशव्या व मद्याच्या बाटल्यांमुळे परिसर बकाल बनला आहे. कुठेही शेकोट्या पेटविणे, कचऱ्याचे ढिग जमावणे, ते जाळणे यामुळे या आगी लागत आहेत. तसेच जैवविविधता आणि परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
सुरूंच्या बनाला आग लावली?
By admin | Updated: April 11, 2016 01:11 IST