वर्धा : येत्या २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट पसरले आहे. जिल्हा परिषद हातून गेली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांवर होईल, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना असल्यामुळे या निवडणुकीसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेवर आजतागायत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीच सत्ता राहिली आहे. अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा भाजपचे काँग्रेसच्या बरोबरीने म्हणजेच प्रत्येकी १७ सदस्य निवडून आले होते. जि.प. वर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पराकोटीच्या हालचाली झाल्या. ऐनवेळी काँग्रेसच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून आली. तरीही बहुमतासाठी एका जागेची गरज होती. दुसरीकडे भाजपही सत्ता स्थापनेसाठी धडपडत होता. भाजपकडे स्वभाप ३, सेना १ आणि चार अपक्ष असे संख्याबळ झाले. अखेर तटस्थ असलेल्या गोपाल कालोकर या अपक्ष सदस्यांच्या हातात सत्तेची किल्ली आली. ते ज्या गटात बसणार त्या गटाचा अध्यक्ष अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कालोकर हे काँग्रेसशी जुळलेले असल्यामुळे त्यांनी आघाडीसोबतच बसण्याचा निर्णय घेतला. यामुळे आघाडीला सत्ता टिकविणे शक्य झाले. आणि पर्यायाने भाजपाचे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अडीच वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आघाडीतील एका सदस्याचे निधन झाल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आणि भाजपचे संख्याबळ एकने वाढले. अशातच स्वभापचा एक सदस्य काँग्रेस गोटाशी हातमिळवणी करुन असल्यामुळे आघाडीच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाही. मात्र आता माजी खासदार दत्ता मेघे हे भाजपमध्ये आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याची माहिती आहे. त्यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे काही जि.प. सदस्य त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर राहिल्यास काँग्रेस-राकाँ आघाडीला सत्ता टिकविणे कठिण जाईल, असे बोलले जात आहे. असे झाल्यास लोकसभा जशी भाजपचे बळकावली. तशीच जिल्हा परिषदही हस्तगत केल्यास याचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर होईल, अशी शक्यताही जाणकार वर्तवीत आहे. एकूणच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही आघाडीतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची तर भाजप नेत्यांसाठी वर्चस्वाची ठरणार आहे. यात कोण जिंकतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभेचे सावट
By admin | Updated: September 16, 2014 23:55 IST