वर्धा : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे शासनाच्यावतीने राजकीय तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या दुखवट्याच्या काळात सर्वच शासकीय कार्यालयातील राष्ट्रध्वज अर्धवट असण्याचा नियम असताना वर्धा जिल्हा परिषदेच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज पूर्णच ठेवत या दुखवट्याला हरताळ फासला गेला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या दु:खात सर्व राष्ट्र सहभागी असल्याचे शासनाच्यावतीने एका पत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे. तसे पत्रही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार दुखवट्याच्या काळात जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात सकाळी फडकविला जाणारा राष्ट्रध्वज अध्र्यावर ठेवत तो नियमानुसार सायंकाळी उतरविण्याचे नमूद आहे. तसे पत्र जिल्हा परिषदेला देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या पत्रानुसार राष्ट्रध्वज अर्धवट करण्याचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्यावतीने त्या पत्राला पर्यायी राष्ट्रीय दुखवट्याला बगल देत राष्ट्रध्वज पूर्ण ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर कार्यालयात राष्ट्रध्वज मात्र अर्धवट ठेवून या दु:खात शासकीय यंत्रणा सहभागी असल्याचे दाखविण्यात आले आहे. निदान तसे करणे अपेक्षित आहे; मात्र जिल्हा परिषदेच्यावतीने तसे करण्यात आले नाही.(प्रतिनिधी)
राष्ट्रीय दुखवट्याला जिल्हा परिषदेचा हरताळ
By admin | Updated: June 4, 2014 23:57 IST