सुगन बरंठ : नई तालीमच्या प्रांगणात बाल महोत्सव व शिक्षक मेळावासेवाग्राम : बालकांचे सुंदर आणि कल्पक असे विश्व असते. त्यात ते रमत असतात. गमत असतात. जे दिसते त्याला बघत, समजून घेत त्याच्यात सामावले जातात. निखळ, निकोप आणि कोमल बालपण जिज्ञासा, उत्सुकता, उत्साह आणि निरागसता घेऊन आपलं जग विकसित करीत असतात. गरज असते ती, त्यांना संधी व मुक्तता देण्याची. अशीच संधी नई तालीमच्या गुणवत्तापूर्ण सार्थक अभियानांतर्गत मुलांना व शिक्षकांना प्राप्त झाली आहे, असे मत नई तालिमचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केले. ‘घेऊ या का गगन भरारी...’ या बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्याचे आयोजन नई तालीम आश्रम परिसरात करण्यात आले. नई तालीम समिती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बजाज समूहाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुलांना विविध गोष्टी सांगत बरंठ यांनी बालकांचे अंतरंग समजून घेत संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ. किरण धांदे, शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, प्राचार्य सुषमा शर्मा, ज्येष्ठ अधिव्याख्याता नितू डंभारे, प्रा. सीमा पुसदकर, प्रा. उर्मिला हाडेकर, डॉ. शिवचरण ठाकूर, संयोजक प्रभाकर पुसदकर तसेच ३६ शाळांतील ८७ शिक्षक उपस्थित होते.‘पहाडी पर पेड था...’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मुलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच वर्धा जिल्ह्याच्या नकाशाचे त्या-त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी रंग भरून उद्घाटन केले. या सत्रात डॉ. बरंठ यांनी श्रमाच्या आधारावर व्यक्तीच्या अस्मितेचे विभाजन न करता सर्वांशी आदरभाव व सहिष्णुतेने वागण्याबाबत राजाची गोष्ट सांगून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभाकर पुसदकर यांनी केले तर कार्यक्रमाची भूमिका सीमा पुसदकर यांनी मांडली. संचालन अनुश्री दोडके यांनी केले तर आभार देवेंद्र गाठे यांनी मानले.मुक्त व सहजीवनाचा आनंद, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दृश्यरूप, विविध उपक्रमातून जीवनशिक्षण, शिकण्याचा निखळ व निकोप आनंद, ग्रामीण मुलांना एक्सपोझर या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध उपक्रमांच्या आयोजनातून गांधीजींच्या आश्रमातील सादगी, स्वच्छता आणि रम्यता, गांधीचे विचार आणि शिक्षण, खुला आणि मुक्तपणे शिकण्याचा, सहवास व सहजीवनाचा आनंद व खेळी-मेळीच्या वातावरणात २१ विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शिकणे आणि शिकविणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय मातीकाम, चाककाम, किरीगामी, ओरीगामी, विज्ञान खेळणी, चित्र काढणे, वारली पेटींग, कापडावरील चित्रे, सामूहिक नृत्य, लोक नृत्य, सामूहिक गाणी, ग्रिटींग व सजावट, क्वॉलिंग, सर्प विज्ञान, पपेट शो, विविध वेशभूषा, चेहरा रंगविणे, रिंग घालून फिरणे, गाढवाचं शेपूट, फेटे बांधणे, कोलाज बनविणे आणि मैदानी खेळ अशा विविध कार्याची पर्वणीच मुलांकरिता खुली करण्यात आली होती. कुणीही कुठेही जाऊन मुक्तपणे शिकू शकत होते. महोत्सवाला शिवचरण ठाकूर, लक्ष्मी काकडे, ज्योत्स्ना वरघट, अनिल पेंदाम, संजय भगत, नीता माथनकर, अनुश्री दोडके, अश्विनी कचवे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)टाकाऊ वस्तूपासून विविध मॉडेल्सकार्यक्रमाच्या अनुषंगाने कर्नाटक येथील डॉ. एचकेएस स्वामी यांनी टाकावू वस्तूपासून बनविलेल्या विविध मॉडेल्समधून गांधी विचार आणि व्यवहारातील गोष्टी याबाबत तसेच पर्यावरण जागृतीबाबत मार्गदर्शन केले. सर्प विज्ञान याबाबत प्रभाकर पुसदकर व आशिष गोस्वामी यांनी स्लाईड शो फिल्मच्या माध्यमातून मांडणी केली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्ये आणि नाटके सादर केली. समारोप लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत बाहुला-बाहुलीचे लग्न लावून करण्यात आला. सर्व मुलांनी त्यात भाग घेतला आणि सामूहिक नृत्य सादर केले. प्रत्येक मुलांना हाथकागदाची बॅग आणि बालपत्रिका भेट देण्यात आली. बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्यानिमित्त दिपोत्सवाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यासाठी प्रत्येक शाळेने पणत्या आणल्या होत्या. विविध उपक्रमामुळे बाल महोत्सव रंगला.
बालकांचे विश्व सुंदर आणि कल्पक असते
By admin | Updated: February 8, 2016 02:20 IST