वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने शुक्रवारी दुपारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीने धरणाच्या गेटची दुरूस्ती करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. हे गेट दुरूस्त होताच नागरिकांना पाणी देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. पिपरी (मेघे) गावातीन नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रामपंचायतीची नळ योजना आहे. या नळयोजनेला येळाकेळी येथील धरणावरून व धरणाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या येथे असलेल्या छोट्या धरणाच्या गेटमध्ये व नागरिकांना पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड आल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सध्या विहिरीत जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याच्या आधारावर पिपरी गावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र येथील अतिक्रमित असलेल्या या वस्तीत गत पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याने त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. कधी परिसरातील कुण्या विहिरीवरून तर कधी हातपंपावरून भर उन्हात पाणी आणून नागरिकांना त्यांची गरज भागवावी लागत आहे. यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत रोष व्यक्त करण्यात आला. हाच रोष रस्त्यावर आणत संतप्त झालेल्या या वस्तीतील महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी महिलांनी आम्हाला पहिले पाणी द्या नंतर काय ते करा अशी भूमिका घेली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान धरणाची दुरूस्ती व पाईपलाईन मध्ये आलेल्या बिघाडामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. धरणाची दुरूस्ती होताच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)
पाण्याकरीता महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST