तब्बल २२ तास गावातील वीजसेवा खंडीततळेगाव (टालाटुले): हलका वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. बुधवारी वादळामुळे गावातील विद्युत खंडीत झाली ती २२ तासानंतरही सुरळीत झाली नाही. यामुळे येथील विद्युत महामंडळाला वाऱ्याची अॅलर्जी तर झाली नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अन्न, वस्त्र व निवारा या गरजासोबत आता विजही आवश्यक बाब झाली आहे. ग्रामीण भागही आता प्रकाशाशिवाय राहू शकत नाही. येथील विद्युत मंडळात १० ते ११ गावे येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे तळेगावात पाच लाईनमनची आवश्यकता आहे. असे असताना येथे एका लाईनमनवरच काम सुरू आहे. या भागात केवळ पाच लाईनमन कार्यरत आहेत. त्यामुळे येथील विद्युत मंडळाची मदार खासगी कामगारावर आहे. या गावात लाईनमन एकच असल्याने वेळेवर तक्रारीचे निवारण होत नसल्याने येथील शेतकरी व घरगुती ग्राहक खासगी माणसाला पैसे देवून कामे करीत असल्याचे वास्तव आहे. याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. चोरीमुळे गावात दहशत गावात दोन दिवसांपूर्वी रात्री अमोल भेंडे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील घरात दोन लाखांची घरफोडी झाल्याने गावकरी अधिकच धास्तावले. त्यातच काल गावात काळोख पसरल्याने आणखीच गावकरी भीती निर्माण झाली होती. पावसाळयाचे दिवस जवळ येत आहे. या दिवसात जर स्थिती अशीच राहिली तर गावकऱ्यांना रोजच अंधारात राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
वीज महामंडळाला वाऱ्याची ‘अॅलर्जी’
By admin | Updated: May 6, 2016 01:52 IST