रोहणा : शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही. मग, ते भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी त्याविरूद्ध आवाज उठविला जात नाही. शिवाय अन्य वस्तूंच्या महागाईवर सर्व गप्प असतात. यामुळे शेतमाल, पालेभाज्यांच्या दरवाढीवरच ओरड का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतमाल व पालेभाज्या तथा डाळींचे भाव थोडे वाढले तरी नोकरदार, व्यावसायिक व उद्योगपती भाववाढी विरूद्ध आवाज उठवितात. शासन यावर आयातीचा उपाय करून शेतमालाचे भाव पाडतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या खिशात येणारे अधिकचे दोन पैसे त्वरित थांबतात. उलट भाव पडतात तेव्हा कुणीही ओरडत नाही. सद्यस्थितीत कांद्याला अजिबात भाव नाही. वांगे, टमाटर ठोकमध्ये पाच रुपये किलो मिळतात. फुलकोबी व पानकोबी किलोऐवजी पाच रुपये नगाने मिळते. पाच रुपयांत जुडीभर सांभार मिळतो. तायवान पपईला ग्राहक मिळनासे झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा व्यापाऱ्यांअभावी गळून झाडाखालीच सडला. मृग बहराच्या संत्र्याला भाव आहे तर झाडावर संत्रीच लागली नाही. आज भाजीपाला बाजारात आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. कापसाचे भाव ४८०० वरून ४४०० पर्यंत खाली आले. दहा हजार रुपये भावाच्या तुरी सात हजारापर्र्यंत खाली आल्या. सोयाबीन ३५०० च्या वर जात नाही. गव्हाचे भाव उत्पादन खर्चाला परवडणारे नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी कुणीही ओरडताना दिसत नाही. शासन, प्रशासन, विरोधी पक्ष सारेच गप्प आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी हताश झाला असून धोरणात्मक उपाय गरजेचे झाले आहेत.(वार्ताहर)
शेतमाल, पालेभाज्यांच्या भाववाढीवर ओरड का?
By admin | Updated: February 26, 2016 02:42 IST