कारंजा (घा.) : डिमांड भरल्यानंतरही गत दोन वर्षांपासून तालुक्यातील २० शेतकरी कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात विहिरीला पाणी असून केवळ वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करणे कठीण जात आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ओलितासाठी नवीन वीज जोडणी पाहिजे म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०१२ ला अर्ज करून डिमांड सुद्धा भरले आहे. असे असताना या शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी देण्यात आली नाही. कारंजा विजवितरण कंपनीला या बाबत विचारले असता, या जोडणीकरिता लागणारे पोल व विद्युत जोडणी साहित्य पुरवण्याचा कंत्राट हैदराबाद येथील एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून अद्यापही जोडणी साहित्य व पोल पुरविण्यात आले नाही. त्यामुळे जोडणी देण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. या विलंबामध्ये स्थानिक वितरण कंपनीचा दोष नसल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरात लवकर वीज जोडणी दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकरी विनोद वलगावकर यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून २० शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा
By admin | Updated: January 11, 2015 23:02 IST