१८ घरांचे छत उडाले : सात बकऱ्या व असंख्य कोंबड्या मृत्यूमुखीसमुद्रपूर : तालुक्यातील वायगाव (गोंड) येथील पारधी बेड्याला गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामुळे १८ घरे उडाली तर सात बकऱ्या ठार झाल्या. या वादळाच्या तडाख्यात ५० च्यावर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. या वादळात घरावरील छप्पर उडाल्याने कुलर, टिव्ही, लाईनचे खांब व वृक्ष जमिनदोस्त झाले. समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) या गावाच्या बाहेरच्या पारधी वस्ती आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण बेडाच उद्ध्वस्त झाला. यात मिलिंद मंगल पवार यांचे घर उडाले. त्यांच्या तीन बकऱ्या ठार झाल्या तर २० कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जिनीता राऊत यांनी नुकतेच घराचे काम सुरू केले होते. लेंटर सज्जा पर्र्यंत भिंती उभ्या झाल्या होत्या; परंतु वादळामुळे त्या जमिनदोस्त झाल्या. यात त्यांच्या मालकीच्याही दाने बकऱ्या आणि १० कोंबड्या ठार झाल्या. अनंता भोसले यांचे घर पडले असून दोन बकऱ्या जखमी झाल्या तर १२ कोंबड्या ठार झाल्या. ललीता भोसले यांचे घर उडाले. या व्यतिरिक्त सर्कस पवार, राजकला पवार, सुभाष बकाल, अंकीत पवार, शक्तीकपूर राऊत, संजय पवार, जंगलू पवार, राजेश भोसले, इद्रपाल पवार, शंकुतला भोसलेख पितृल भोसले, निलेश भोसले, शिशुपाल पवार यांची घरे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कित्येकांचे कुलर, टिव्ही संचाचे नुकसान झाले. १० ते १२ वीज खांब वाकले, तीन झाडे उन्मळून पडली. तलाठ्याने पारधी बेडा गाठत पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल तहसीलदार सचिन यादव यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले. मात्र जोपर्यंत ६० मी.मी. पाऊस होणार नाही तोपर्यंत वादळग्रस्तांना मदत मिळत नाही, या अटीमुळे त्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
वायगाव (गोंड) पारधी बेड्याला वादळाचा तडाखा
By admin | Updated: May 6, 2016 01:55 IST