रोहणा : स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षाने गावात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. येथे नागरी सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. सुविधा प्रदान करण्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करुनही याकड दुर्लक्ष होत आहे. गावातील बसस्टॅँड परिसर व अंतर्गत रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारी प्रभावीत झाली आहे. बसस्टॅँड परिसरात तर मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता बळावली आहे. हे अतिक्रमण हटविण्याची गरज व्यक्त होत आहे. आठवडी बाजारातील अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे परिसरातील रहिवाश्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्युत वितरण कंपनीद्वारे विद्युतीकरण करताना गाडलेले खांब वाहतुकीला अडसर ठरत आहे. खांबावरून टाकलेल्या विद्युत तार अनेक ठिकाणी लोंबकळत आहे. या तारेचा स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. दुर्घटना होण्यापूर्वी खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. गावात एकही सार्वजनिक वाचनालय नाही. त्यामुळे युवकांमधील वाचन संस्कृती संपुष्टात येत आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गावात खुलेआम दारूची विक्री होत आहे. पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून खितपत पडली आहे. गावकऱ्यांना त्यामुळे समस्येला तोंड द्यावे लागते. शेतात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पांदण रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. पांदणी हरविल्याने शेतमाल रहदार प्रभावीत झाली आहे. गावातील पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेली १ कोटी ४४ लाखांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र ही योजनाही रद्द झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते. आर्वी तालुक्यातील एक राजकीय संवेदनशील व लोकसंख्येने मोठे गाव असलेल्या येथील समस्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. एकेकाळी तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे राजकारण रोहणा येथून चालायचे. काळाच्या ओघात राजकीय वैभव संपुष्टात आल्याने गावकऱ्यांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य केंद्रातही रिक्त पद असल्याने आरोग्य सुविधा कोलमडली आहे.(वार्ताहर)
नागरी सुविधांअभावी ग्रामस्थ त्रस्त
By admin | Updated: February 22, 2016 02:24 IST