लक्ष्मीपथी राव : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रवर्धा : शैक्षणिक बेरोजगारांच्या समस्येने आज रौद्ररूप धारण केले आहे. एका बाजूने शिक्षित तरुणांची वाढती संख्या तर दुसऱ्या बाजूने रोजगाराचा अभाव, अशी विसंगत सामाजिक परिस्थिती देशात निर्माण झाली. शिक्षणाचे सार्वत्रीकीकरण होत आहे; पण गुणवत्ता व सुकूशलता लोप पावत चालली आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाचा अभाव हेच आजच्या बेरोजगारीच्या समस्येचे मूळ होय, असे मत बंगलोरस्थित नॅक संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण विभागाचे संचालक व आयक्वॅकचे समन्वयक डॉ. लक्ष्मीपथी राव यांनी व्यक्त केले.नॅकद्वारे प्रायोजित व यशवंत महाविद्यालयाद्वारे ‘महाविद्यालयासाठी शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणाची आवश्यकता’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी ते बिजभाषण करीत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख तर अतिथी म्हणून एमगिरीचे संचालक डॉ. प्रफुल्ल काळे, प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे, आयक्वॅकचे समन्वयक डॉ. विलास ढोणे उपस्थित होते. डॉ. काळे यांनी उदात्त शिक्षकी पेशाला अधिक उपयुक्त बनविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविलेल्या ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन केले. डॉ. चिंधडे यांनी महा.च्या विकासात शैक्षणिक दस्तावेजांचे महत्त्व विषद करून इंग्लंड येथील शेक्सपियरच्या समाधीवर लावलेल्या त्याच्या जन्माच्या दाखल्याचा उल्लेख केला. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी नॅक अंकेक्षण अहवाल कसा तयार करावा, हा उद्देश समोर ठेवून चर्चासत्राच्या विषयाची निवड करण्यात आली, असे सांगितले. यावेळी डॉ. ढोणे यांनी उच्च शिक्षणात महाविद्यालयीन नॅक अंकेक्षणाचे महत्त्व विषद केले. चर्चासत्राच्या निमित्ताने विविध महाविद्यालयातील आयक्वॅकच्या समन्वयकांनी पाठविलेल्या संशोधन निबंधांच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख, कुलगुरू डॉ. एस.पी. काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू डॉ. गिरीश्वर मिश्र यांनी पाठविलेल्या संदेश व शुभच्छापत्रांचे वाचन डॉ. ढोणे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाला बा.दे. अभियांत्रिकी महा.चे संचालक समीर देशमुख, प्राचार्य व्ही. के. पांडे, प्राचार्य बाबा घोरपडे, प्राचार्य बी.जे. हाडके, प्राचार्य डॉ. किशोर अहेर, डॉ. बैंदुर, डॉ. कल्पना जाधव उपस्थित होते. तत्पूर्वी संगीत विभागप्रमुख प्रा. अरुणा हरले यांच्या मार्गदर्शनात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यानी विद्यापीठ व स्वागत गीत तसेच स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संचालन डॉ. रविशंकर मोर यांनी केले तर आभार प्रा. क्षिप्रा सिंघम यांनी मानले. विविध राज्यातील आयक्वॅकचे समन्वयक उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या चर्चासत्रात संशोधनपर निबंध सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यशाकरिता प्रा. खान, प्रा. सिदुरकर, डॉ. निंबाळकर, प्रा. भोयर, प्रा. देशमुख, डॉ. बोबडे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)गुणवत्ता विकास ही सामूहिक जबाबदारीेमहाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे ही प्राचार्य व प्राध्यापकांची सामूहिक जबाबदारी आहे. प्राचार्याच्या प्रेरणेने प्राध्यापकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यगुणांचा विकास करणे शक्य आहे, असे मतही डॉ. लक्ष्मीपथी राव यांनी व्यक्त केले. शिवाय महाविद्यालयाच्या गुणवत्ता व प्रशासकीय नॅक अंकेक्षणाची गरज असल्याचे सांगितले.
रोजगाराभिमुख शिक्षणाचा अभाव हेच बेरोजगारीचे मूळ
By admin | Updated: February 21, 2016 01:35 IST