वर्धा : अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे. शेतीला पूरक डेअरी व्यवसाय असला तरी बँकांची कर्ज प्रकरणे मंजुरीत असलेल्या उदासीनतेमुळे आता हा व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्यांना डेअरी क्षेत्रात जोडधंद्यातून आधार देण्यासाठी गाई, म्हशी, शेळ्या खरेदीकरिता जिल्हा ऋण योजनेतून यावर्षी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले होते. वर्ष संपले तरी एकाही राष्ट्रीकृत बँकेत कर्ज प्रकरणे मंजूर नसल्याचे समजते. ठरविल्याप्रमाणे कर्ज प्रकरणे वेळोवेळी मंजूर झाली असती तर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना दुधाळ जनावरे मिळून जोडधंदा करता आला असता कर्जाच्या खाईतून बाहेर निघून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग गवसला असता. जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. यावरुन शासकीय योजनेचा लाभ जनतेला वेळीच मिळत नसल्याचे दिसून येते. शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत अपयश आले असताना लोकप्रतिनिधी काय करतात, हा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कोटयवधी रुपयांचे कर्ज गाय, म्हशी खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काहीच शाखांनी मोजक्याच केसेस बकर्या खरेदीसाठी केल्या. पण ग्रामीण व राष्ट्रीकृत बँकांनी दोन्ही बाबतीत वर्षभर उदासीन धोरण राबविले आहे. गरजुंना वर्षभर दुधाळ जनावरांसाठी कर्ज मिळाले नाही. शेतकर्यांना जोडधंद्यासाठी कर्जच उपलब्ध होत नसेल तर त्यानी जोडधंदा कसा करावा, हा प्रश्नच आहे. दुधाळ जनावरांसाठी जर शेतकर्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन दिले तर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. सध्या दुधाचे दर वाढतच आहे.(शहर प्रतिनिधी)
दुग्ध व्यवसाय अडचणीत
By admin | Updated: May 31, 2014 23:41 IST