वर्धा : प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधने मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपारिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळते. पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे .पूर्वीच्या काळी सुतार, लोहार, कुंभार यांना शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष स्थान होते. सुतार हा शेतीसाठी लागणारे वखर, नांगर, दरवाजे बनवून द्यायचे. आता हे साहित्य लोखंडी स्वरूपात मजबुत प्रकारात बाजारात मिळत असल्याने त्याचा परिणाम लोहार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे. पारंपरिक पद्धतीने कातड्यावर प्रक्रिया करुन पादत्राणे तयार केले जायचे. पद्धतीनुसार चपला, जोडे बाजारात उपलब्ध झाल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुंभार मातीला एकजीव करून माठ, सुरई, पणत्या, राजण तयार करून आपला उदरनिर्वाह चालवित असे, आता या व्यवसायालादेखील उतरती कळा लागली असून या व्यवसायिकांना आता शासकीय मदतीची गरज व्यक्त केली जात आहे.बाजारपेठेत आधुनिक तंत्राचा व यांत्रिक पद्धतीने बनविलेल्या साधनांनी शिरकाव केल्याने या पारंपरिक व्यवसायिकांनी बनविलेल्या साहित्याला आता विशेष मागणी नसते. जागतिकीकरणात ग्रामीण भागातही या वस्तू सहजगत्या उपलब्ध होत असल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रामीण भात तर कुंभाराचे चाक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तप्त आगीत लोखंडाचा आकार देवून ग्रामस्थांना पावशी, कुऱ्हाड, विळा तयार करणाऱ्या लोहार समाजावर आधुनिकतेमुळे व्यवसाय बंदीचा बडगा आला आहे. या व्यवसायिकांना आता कामाच्या शोधात शहरामध्ये भटकंती करावी लागत आहे. व्यवसायिकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची ओळख करुन दिल्यास व्यवसायाला संजीवनी मिळेल.(स्थानिक प्रतिनिधी)
आधुनिक साधनांमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात
By admin | Updated: April 26, 2015 01:33 IST