जोगेंद्र गवई : ‘विकासनीती व भारतीय संविधान’वर व्याख्यानवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना विशेष महत्त्व दिले. भारतीय राजकीय व्यवस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक न्यायातून कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा होता. त्यामुळे त्यांनी राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक व आर्थिक लोकशाही महत्त्वाची मानली. पण सध्याची विकासाची नीती जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाला प्राधान्य देणारी व शोषित, पीडित, वंचित, घटकांना विकासापासून वंचित ठेवणारी असल्याचे मत रातुम नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जोेगेंद्र गवई यांनी व्यक्त केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव वर्षानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ‘विकासनीती व भारतीय संविधान’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विधी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक पावडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय बोबडे आदी उपस्थित होते.डॉ. गवई म्हणाले, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या ६५ टक्के शेतकरी व शेतमजुरांच्या मतांवर निवडून येणारे प्रतिनिधी कायदेमंडळामध्ये भांडवलदारांच्या हिताचा विचार करून धोरणे राबवितात. त्यामुळेच बँकांमार्फत भांडवलदारांनी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी भाग पाडले जात आहे. एकूणच सर्वत्र ही विसंगत स्थिती आज सर्वत्र दिसून येत आहे. डॉ. आंबेडकरांनी सूचविलेली समाजवादी राज्याची संकल्पना संविधानात समाविष्ट केली असती, तर खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली असती असेही ते यावेळी म्हणाले.डॉ. पावडे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही सामाजिक, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. परंतु राज्यकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतेही राज्यकर्ते असो त्यांना संविधानाप्रमाणे चालावेच लागेल. यासाठी प्रत्येक नागरिकांनी संविधानाविषयी जागृत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्राचार्य डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकेतून डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त महाविद्यालयातून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर व भारतीय संविधान याविषयी प्रत्येकाने जागृत राहणे आवश्यक आहे. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचेही ते म्हणाले. डॉ. बोबडे यांनी विषयासंबंधी भूमिका मांडली व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन प्रा. रवींद्र बेले यांनी केले. आभार प्रा. सुचिता रायपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला यशवंत ग्रामीण संस्थेचे संचालक प्रकाश ढांगे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, प्राचार्य व्ही. के. पांडे, बाबासाहेब बेले, प्रदीप दाते उपस्थित होते. यशस्वीतेकरिता प्रा. दिलीप देशमुख, प्रा. एकनाथ, मुरकुटे, प्रा. प्रमोद नारायणे, डॉ. यु. बी.पारेकर, डॉ. वीरेंद्र बैस, प्रा. नरेश कवाडे, प्रा. संदीप चव्हाण, डॉ. संजय धोटे, प्रा. बुद्धघोष लोहकरे, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. भटकर, प्रा.धनवीज यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
आजची विकासनीती खासगीकरणास पोषक
By admin | Updated: February 24, 2016 02:16 IST