रूपेश खैरी ल्ल वर्धाग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडत असून त्याला मुख्यालयी राहण्याच्या नियमाला दांडी मारणारे कर्मचारी कारण ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर आळा बसविण्याकरिता जि.प.च्या आरोग्य विभागाच्यावतीने पथक तयार केले आहे. या पथकाची करडी नजर या कर्मचाऱ्यांवर राहणार असून यात सापडलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे. शासनाच्यावतीने सर्वसामान्यांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्याकरिता असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. योजनांचा लाभ या नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्या कुचकामी ठरत असून यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. या मागच्या कारणाचा विचार केला असता या योजना राबविताना कर्मचाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचे दिसले. अत्यावश्यक शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा नियम आहे. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवेत असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांनी नियमाची अंमलबजावणी करीत मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मात्र तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता या विभागातील निम्मे कर्मचारी या नियमाला बगल देत असल्याचे दिसून आले आहे. या कर्मचाऱ्यांना अनेकदा संबंधीत विभागाकडून मुख्यालयी राहण्याची कल्पना देण्यात आली असून त्यांच्याकडून याकडे सदैव दुर्लक्ष झाल्याचेच समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आपण मुख्यालयीच राहत असल्याचे त्यांच्याकडून पुराव्यासह सांगण्यात येत आहे. यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांवर आळा घालण्याकरिता जि.प.च्या आरोग्य विभागाच्यावतीने फिरते पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला अचानक भेटी देणार आहेत. यात कार्यालयात अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यातही काही कारणाची मुभा देण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष ४कर्मचाऱ्यांकडून मुख्यालयाच्या निर्णयाला मिळणाऱ्या दांड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकरिता असलेल्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहाचत नसल्याचे समोर आले आहे. शिवाय कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने आकस्मिक सेवा पुरविणे कठीण जात आहे. यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. याकडे लक्ष वेधण्याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत अनेक वेळा सूचना करण्यात आल्या आहेत; पण कर्मचाऱ्यांनी याकडे सदैव दुर्लक्ष केले आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देण्यात येणार आहे. यात काही कारणे वगळता कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. - डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.शासनाच्यावतीने सर्वसामान्यांकरिता आरोग्य विषयक अनेक योजना राबविण्यात येत आहेत; पण कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने या योजना निरुपयोगी ठरत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेत आकस्मिक भेटीकरिता पथक तयार केले आहे. - मिलिंद भेंडे, आरोग्य व शिक्षण सभापती, जि.प. वर्धा.
मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पथकाची नजर
By admin | Updated: January 29, 2016 04:48 IST