वर्धा : दारूविकी करण्याची माहिती पोलिसांना दिली. या कारणावरून आनंदनगरात दोन गटात तलवार युद्ध झाले. यात शेख नजिम शेख सलीम हा गंभीररित्या जखमी झाला तर अजीज खॉ पठाण (३८) हा किरकोळ जखमी आहे. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद नगरातील शेख नजीम शेख सलीम (१८) याच्यावर याच परिसरात राहणाऱ्या अजीज खॉ पठाण याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने हल्ला केला. दारूविक्रीची माहिती पोलिसांना दिली या कारणावरून अजीजने इम्मू शेख, तौसिब शेख, सोहल शेख, गोलू यांच्यासह शेख नजीमच्या घरावर चालून गेला. त्याला मारहाण करून त्याच्यावर तलवारीने वार केले. यात तो रक्ताच्या थोराळ्यात पडला. त्याच्या आईने त्याला रुग्णालयात दाखल केले. यानंतर १०.३० वाजताच्या सुमारास मोनू शेख, सोनु शेख व आसिफ काल्या या तिघांनी अजीज खॉ पठाणवर तलवारीने हल्ला चढविला. याप्रकरणी दोन्ही गटांवर भादंवीच्या कलम ३२४, ३२६, १४७, १४८ व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.(स्थानिक प्रतिनिधी)
आनंदनगरात दोन गटात तलवार युद्ध
By admin | Updated: December 2, 2014 23:11 IST