आर्वी : महाराष्ट्र बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता विम्याची अट घातली़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ही अट रद्द करावी व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यात यावे, अशी मागणी प्रहारने केली़ यासाठी शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी महाराष्ट्र बँकेने विम्याची ५ हजार रुपयांची नाहक अट घातली होती़ विमा काढल्याशिवाय बँकेतून कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरातील अन्य राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विम्याची अट न घालता पीक कर्ज वितरित करण्यात येत असल्याने शेतकरी बँकेत विम्याबद्दलच्या चौकशीकरिता गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन धुडकावून लावले जात होते़ याबाबत माहिती शेतकऱ्यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांना दिली़ यावरून त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी बँकेवर मोर्चा नेला़ पीक कर्जाच्या मागणीसाठी बँकेच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले़ दोन्ही मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका बाळा जगताप यांनी घेतली़ यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी बँकेचा निषेध नोंदवित नारेबाजी केली़ आंदोलन सुरू असताना शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.आर्वीचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. एक तासाच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या दोन्ही मागण्या मंजूर करण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्याकरिता आता विमा देण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढण्याकरिता होणारा त्रास व अटी रद्द झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला.(तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र बँकेसमोर प्रहारचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST