वर्धा : वाढती महागाई व भाजप शासनाच्या फसव्या जाहिराती यांच्या विरोधात वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीने आरती चौक येथील पेट्रोल पंपाजवळ ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शिवाय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास रास्ता रोको करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारला सत्ता स्थापून दोन वर्षे झाली आहे. सध्या संपूर्ण प्रसार माध्यमांतून ‘मेरा देश बद्दल रहा है’चा प्रचार मोदी सरकार करीत आहे; पण त्या जाहिराती किती फसव्या आहेत, हे वाढत्या महागाईवरून स्पष्ट होते. भारत देश जगात सुपर पॉवर बनत असताना अन्नदाता शेतकरी बेहाल आहे. हजारो कोटी सरकारकडे प्रचाराला आहे; पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी नाही. रोजगार व्यवस्था कोलमडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव चार पट कमी असताना सरकार जनतेचे शोषण करीत आहे. याविरूद्ध युवक काँगे्रसद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केली. लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव गौरव देशमुख यांनी फसव्या जाहिराती करून सामान्यांच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. याचा सर्वस्तरातून निषेध केला जाईल, असे सांगितले.आंदोलनात गौरव देशमुख यांच्यासह युवक काँगेसचे कुणाल भाकरे, बाबा जाकीर, जीमित व्यास, आसीर शेख, सन्नी यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)
महागाई विरोधात युवक काँगे्रसचे रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: June 10, 2016 02:15 IST