यंदा १६२० हेक्टरचे नियोजन : गतवर्षी ३४९८ हेक्टरमध्ये होती पेरणी वर्धा : सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात. यंदा १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा जिल्ह्यातील कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ३९.२६ इतकी आहे. गतवर्षी ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली होती. भूईमुंग पीक घेण्यासाठी हलकी, मध्यम प्रतीची, सेंद्रीय पदार्थ व कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेतजमीन लागते. गतवर्षी जिल्ह्यात एकूण १ हजार ६२० हेक्टर इतके उन्हाळी भूईमुंगाचे नियोजित क्षेत्र होते; पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भूईमुंग पिकाला प्रथम प्राधान्य दिल्याने त्यावेळी एकूण ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये लागवड झाली. आर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ४५ हेक्टरमध्ये सूर्यफूलाचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या वर्षी मागील वर्षी इतक्याच क्षेत्रात भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीपर्यंत कृषी विभागानेच भूईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून दिले होते; पण यंदा कृषी विभागाच्या सहकार्याने महाबीज सोबत समन्वय साधून ६० टक्के दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भूईमुंग पिकाकडील कल वाढावा म्हणून कृषी विभागाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.(शहर प्रतिनिधी) सेलू तालुक्यात होती सर्वाधिक लागवड मागील वर्षी जिल्ह्यात १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. यात सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार २०० हेक्टरचा पेरा झाला होता. आर्वी तालुक्यात ५२५ हेक्टर, कारंजा (घा.) १९७, आष्टी (श.) २०९, वर्धा १२०, देवळी २३५ तर समुद्रपूर तालुकयात १२ हेक्टरमध्ये उन्हाळी भूईमुंगाचे पीक घेण्यात आले. त्याची टक्केवारी २३३ इतकी होती.
भूईमुंगाचा पेरा ३९.२६ टक्के
By admin | Updated: April 2, 2017 00:54 IST