वर्धा : स्मार्टफोन आणि टूजी, थ्रीजी सेवांमुळे शहरासह जिल्हाभरातील २५४ सायबर कॅफे सध्या कुलूपबंद अवस्थेत दिसून येत आहेत़ स्मार्टफोनच्या अतिक्रमणामुळे सायबर कॅफे हा व्यवसायच धोक्यात आल्याचे चित्र आहे़ यामुळे सदर व्यावसायिकही हैराण झाले आहेत़ अवघ्या जगाला एका क्लिकवर जोडणार्या इंटरनेटमुळे गत काही वर्षांत सायबर कॅफेची दुकाने शहरासह ग्रामीण भागात सुरू झाली होती. दीड-दोन वर्षापर्यंत हा व्यवसायही चांगला चालला़ विविध जागांचे अर्ज भरणे, ई-मेलसह इतर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी अनेकजण इंटरनेटसाठी सायबर कॅफेवर येत होते. अनेक शासकीय कार्यालयांतही इंटरनेट नसल्याने तेथील अधिकारी, कर्मचारीही या कॅफेमध्ये दिसून येत होते़ फेसबुक, आॅर्कुट यासह इतर सोशलसाईटवर चॅटिंगसाठीही अनेकजण या कॅफेमध्ये गर्दी करीत होते़ शिवाय आॅनलाईन गेम खेळण्याचा छंद असलेले अनेक युवकही या कॅफेत तासन्तास बसत असल्याने हा व्यवसायही चांगल्या पद्धतीने चालत होता़ मोजक्याच व्यक्तींच्या घरी संगणक, लॅपटॉप असल्याने घरगुती इंटरनेट वापरणार्यांची संख्या तोकडीच होती; पण लॅपटॉपसह संगणकाचे दर कमी झाले व इंटरनेटची सुविधा अल्पदरात मिळू लागल्यानंतर अनेकांनी इंटरनेटचा घरगुती वापर सुरू केला. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक युवकांसह, युवती, महिलांच्याही हातात स्मार्ट फोन खणखणू लागले आहेत. या स्मार्ट फोनवरच टूजी, थ्रीजी सेवा उपलब्ध होत असल्याने कोठेही आणि कधीही इंटनरेटवरील कामे करता येतात़ यामुळे अनेकांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. घर असो वा शेत तेथे मोबाईलवरून कामे करणे सुलभ झाले आहे. शिवाय लॅपटॉपवरही मोबाईल कार्ड वापरून इंटरनेट वापरता येणे शक्य झाले आहे. स्पर्धेच्या युगातील या सर्व बाबींमुळे शहरासह जिल्हाभरातील सायबर कॅफे कुलूपबंद दिसू लागली आहेत. अनेकांनी दुकानांना कायमचे टाळे ठोकून इतर व्यवसायास पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ युवकांनी छंदाचे रूपांतर या व्यवसायात केले होते; पण मोबाईलच्या युगात आता हा हायटेक व्यवसायही मागे पडल्याचे दिसून येत आहे़ यामुळे अनेक युवकांना दुसरा व्यवसाय शोधावा लागत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
सोशल मीडियामुळे ‘सायबर कॅफे’ धोक्यात
By admin | Updated: May 23, 2014 00:09 IST