वर्धा : दाराची साधी कडी लावून घराजवळ असलेल्या नातलगाकडे गेलेल्या हिंगणघाट फैल येथील तिवारी यांच्या घरून चोरट्यांनी ५ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना पुलागव येथे शनिवारी सायंकाळी ते घरी गेल्यावर उघड झाली. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. चोरीची तक्रार होताच पुलगाव पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळ गाठले; मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या चोरीत घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख असा ऐवज घेवून चोरटे पसार झाले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील गणेशप्रसाद तिवारी यांचे कुटुंबीय परिसरातील त्यांच्या संबंधितांकडे गेले. नातलगाचे घर जवळच असल्याने त्यांनी घराच्या दाराला कुलूप लावलेले नव्हते. ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी लगेच पोलिसांना दिली. पोलिसांसमक्ष घरातील साहित्याची पाहणी केली असता कपाटातील सोडचार तोळ्याचा नेकलेस, साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठय़ा, दोन जोड सोन्याचे कानातले, साडेतीन तोळे वजनाचा नेकलेस, मंगळसूत्र, अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र, साडेतीन तोळे वजनाच्या चार अंगठय़ा, अडीच तोळे वजनाचे कानातले असे २४ तोळे सोन्याचे दागिने तसेच १२ तोळे वजनाचे चांदीचे दागिने व रोख ३३0 रुपये लांबविल्याचे समोर आले. या प्रकरणी पुलगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून भादंवि कलम ४५४, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नसून तपास सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
उघड्या दारातून पळविला ५.६0 लाखांचा ऐवज
By admin | Updated: May 25, 2014 23:46 IST