लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात लाल मिरचीची आवक बंद असल्याने तडका महागला आहे. मिरचीचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांवर पोहोचला आहे.वर्धा जिल्ह्यात भिवापूर, उमरेडसह अन्य जिल्ह्यातून लाल मिरची येते. जिल्ह्यातील काही भागातील शेतकरीही मिरचीचे उत्पादन घेतात. उन्हाळ्याच्या कालावधीतच गृहिणी वर्षभराचे मिरची पावडर तयार करून ठेवतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. पंतप्रधानांनी १ध एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असला तरी लॉकडाऊन कायम आहे. बाजारपेठेतीलकाही व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मिरचीसह उडीद, मूग, तूर, चणा आदी डाळींनी भावात शंभरी गाठली असतानाच मिरचीचे भाव २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे. परिणामी, मिरचीची आवक बंद आहे. बाजारपेठेतील किराणा दुकानात ज्या व्यावसायिकांकडे मिरचीचा जुना साठा आहे, ते विक्री करीत असून २०० ते २२५ रुपयांत मिरची विकली जात आहे. लाल मिरचीचे दर आणखी वधारण्याची शक्यता ठोक मिरची विक्रेते आणि किराणा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मिरची दररोजच्या जेवणातील महत्त्वपूर्ण घटक आहे. दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलडमले आहे.रेडिमेड मिरची पावडर ४०० रुपये किलोबाजारपेठेत विविध कंपन्यांचे पॅकेटबंद मिरची पावडर उपलब्ध असून ते अत्यंत महागडे आहे. ४०० रुपये किलोप्रमाणे या पॅकेटबंद मिरची पावडरची विक्री होत आहे. सधन कुटुंबीयांकडूनच या मिरची पावडरची मागणी होत आहे. मात्र, सर्वसामान्यांना खरेदी करणे आवाक्याबाहेरचे आहे.