प्रभाकर शहाकार - पुलगावराजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्यासह येथे औद्योगिक वसाहत स्थापन करा ही मागणी गत तीन दशकापासून शहरवासी करीत आहेत. या मागणीला आज तीन दशकाचा कालावधी होत असला तरी ही मागणी मार्गी निघाली नाही. याकडे नवे पालकमंत्री लक्ष देतील काय असा प्रश्न पुलगाव येथील नागरिकांनी केला आहे.शासनाने काही जिल्ह्याचे विभाजन करून नवे जिल्हे व तालुक्याची निर्मिती केली. शासनाच्या लेखी आश्वासनानंतरही पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात आला नाही. राज्यात भाजपा सत्तेवर आल्यास पुलगाव तहसील होणार म्हणजे होणारच, ही काळ्या दगडाची लकीर आहे, असे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत जाहीर गर्जना करणारे विद्यमान अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार आपला शब्द पाळणार की फिरविणार? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. १९७८ पासून पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, अशी जनतेची मागणी आहे. पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७८ गावांचा समावेश करून या शहराला तालुक्याचा दर्जा द्या. या मागणीसाठी अनेक सामाजिक, नगरपरिषद, ग्रामपंचायतसह विविध संस्थानी राज्य शासनाने निवेदने दिलीत. मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर वसलेल्या या शहरातून नागपूर मुंबई द्रुगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ महामार्ग जात आहे. शहरालगतच बारमाही वाहणारी वर्धा नदी आहे. अनेक शैक्षणिक संंस्था, नगरपरिषद उपविभागीय पोलीस कार्यालय, उपकोषागार राष्ट्रीयकृत बँका, परिवहन आगार, कृषी उत्पन्न बाजार समिती, याशिवाय न्यायालय, केंद्रीय दारूगोळा भांडार व कॉटन मीलसह सर्वच भौतिक सुविधा उपलब्ध आहे. असे असतानाही राज्य शासन या शहराला तालुक्याचा दर्जा देण्यास व औद्योगिक वसाहत देण्यास टाळाटाळ करीत आहे.
पुलगाव तालुक्याचा प्रश्न अधांतरीच
By admin | Updated: January 13, 2015 23:04 IST