सुपरफास्ट गाड्यांचे थांबे नाही : थर्ड रेल्वे लाईन व उड्डाण पुलालाही बगलपुलगाव : हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील नागपूर बडनेरा सेक्शनमधील पुलगाव हे महत्त्वाचे स्थान आहे. पुलगाव रेल्वे स्थानकासंदर्भात अनेकदा राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधीनी दिल्ली दरबारी रेल्वे मंत्री व संबंधितांशी चर्चा केली. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतरही या रेल्वे स्थानकासंदर्भातील अनेक प्रश्न केंद्र शासनाद्वारे सादर केलेल्या यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अनुत्तरीतच राहिले. परिणामी यंदाही पुलगावकरांच्या तोंडाला शासनाने पानेच पुसली. पुलगाव-आर्वी मार्गावरील रेल्वे लाईनवर उड्डाणपूल नसल्यामुळे तासनतास वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे वर्धा नदीवरील रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था लोकप्रतिनिधीसह सर्वांनाच माहिती आहे. वारंवार ती संबंधित विभागाच्या लक्षातही आणून दिली. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात तरी या उड्डाण पुलासंदर्भात विचार होईल अशी आशा होती. पण यंदाही पुलगावकरांना भोपळाच मिळाला. ब्रिटिशकालीन वैभवाची साक्ष देणारी, पुलगाव-आर्वी शकुंतला रेल्वेगाडी १० वर्षांपासून बंद करण्यात आली. नंतर हा मार्ग ब्रॉडगेज करून पुलगाव आमला रेल्वेमार्गाचा प्रस्ताव समोर आला. शकुंतला गाडी नव्याने सुरू व्हावी यासाठी काही संघटनांनी उपोषण केले होते, तर काहींनी दिल्ली दरबारी धडकही दिली होती. पण मागणीचा व उड्डाण पुलाचा रेल्वे मंत्र्यांनी कुठलाही विचार केलेला नाही. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय दारूगोळा भांडारातील सैनिक आणि नागपूर, अमरावतीला नियमित ये जा करणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी गीताजंली, आजादहिंद एक्स्प्रेस नवजीवन एक्स्प्रेस, ओखा-पुरी या सुपरफास्ट गाड्याचा थांबा देखील कित्येकदा मागणी करूनही मिळालेला नाही. मासिक पास व लाखो रूपयाचे दैनंदिन उत्पन्न देणाऱ्या पुलगाव रेल्वे स्थानकाचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याची प्रवाश्यांची ओरड आहे. रेल्वे स्थानकावर दोन प्लॅटफॉर्म असून तिसऱ्या प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव शासनाकडे सादर आहे. पण त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने यंदाचा रेल्वे अर्थसंकल्पही पुलगावकरांना भोपळा देऊन गेल्याची खंत पुलगाववासी व्यक्त करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)शकुंतला गाडी नव्याने सुरू करण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष शकुंतला नॅरोगेज ही गाडी पुलगावसह जिल्ह्याची ओळख होती. पण १० वर्षांपूर्वी ती बंद करण्यात आली. ही गाडी नव्याने सुरू कारावी अशी मागणी वारंवार करण्यात आली. यासाठी काही संघटनांनी उपोषणही केले होते. काहींनी दिल्ली दरबारी धडकही दिली होती. त्यामुळे यंदाच्या २०१६-१७ या रेल्वे अर्थसंकल्पात या मागणीचा विचार होऊन त्यासाठी भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा पुलगावसह आर्वी येथील नागरिकांना होती. पण याकडे अर्थसंकल्पात पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. पुलगाव-आर्वी मार्गावरील रेल्वे लाईनवर उड्डाण पूल नसल्यामुळे तासनतास वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे वर्धा नदीवरील रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था लोकप्रतिनिधीसह सर्वांनाच माहिती आहे. वारंवार ती संबंधित विभागाच्या लक्षातही आणून दिली. सोबतच प्रवाश्यांच्या सोयीसाठी गीतांजली, आजादहिंद एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, ओखा-पुरी या सुपरफास्ट गाड्याचा थांबा देखील कित्येकदा मागणी करूनही मिळालेला नाही.या मागणीकडेही दुर्लक्षच झाले.
रेल्वे बजेटमध्ये पुलगावला भोपळा
By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST