तळेगाव (श्या.पं.) : जिल्ह्यात यंदाची पीक परिस्थिती योग्य नसल्याची ओरड आहे. सोयाबीनला एकरी एका क्विंटलचा उतारा आहे कपाशीवर विविध किडींनी हल्ला केला आहे. याची वस्तुत: माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी सलील यांनी बुधवारी तळेगाव परिसरातील शेतात भेट देत पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आर्वी मतदार संघातील आष्टी तालुक्यात पीक पाहणी दौऱ्यानिमित्त तळेगाव येथील शेषराव बोबडे, राजू पचारे यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीची जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी केली. कपाशीचे झाड लाल पडून कोमेजत असल्याचे त्यांना दिसले. शेतकऱ्यांनी त्यांना या भागात एकरी ६० ते १०० किलो सोयाबीन झाल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष एका शेतात सोयाबीन काढणे सुरू असताना वास्तवाची पाहणी केली. काही शेतकऱ्यांनी आम्ही सोयाबीन पाहून सवंगलेच नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विशेष कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जोरे, सरपंच सुनीता जोरे, वायद खॉ पठाण, माजी सरपंच मंगेश जाचक यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांचा ताफा होता.(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या
By admin | Updated: October 16, 2015 03:02 IST