वर्धा : येत्या २३ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पिपरी (मेघे) जि.प. गटाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये मतांचे चांगलेच घमासान होणार असल्याचे चित्र आहे. यामध्ये काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीला रंगत आणली आहे. यामुळे नेमकी बाजी कोण मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहेत.भाजपाच्या तिकीटावर मागील निवडणूक जिंकलेले पिपरी(मेघे) गटातील जि.प. सदस्य श्याम गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्य तसेच जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण नऊ जण निवडणूक रिंगणात आपले राजकीय भवितव्य आजमावत आहे. जिल्हा परिषदेत भाजपची अल्प बहुमतात सत्ता आहे. भाजपकडून अविनाश देव रिंगणात आहे. भाजपला एकेका जागेचे महत्त्व आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही चांगलीच कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून प्रमादे दांदडे निवडणूक लढत आहे. काँग्रेसने अमित गावंडे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे, तर शिवसेनेने अविनाश भांडे यांच्यावर बाजी लावली आहे. यासोबतच विविध राजकीय पक्षांचा अनुभव असलेले संजय शिंदे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढत आहे. या पाच उमेदवारांमध्ये खरी लढत असली तरी पहिल्या क्रमांकावर कोण राहील, याची गणिते येथील नागरिक जुळवत आहे. भाजप ही निवडणूकदेखील नरेंद्र मोदी यांच्याच नावावर लढत आहे. सध्याची महाराष्ट्राची राजकीय स्थिती विचारात घेऊनच जनता मतदान करतील, असे बोलले जात आहे. तेव्हा विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे बघण्यासारखे असेल.(जिल्हा प्रतिनिधी)
राजकीय पक्षांमध्ये घमासान
By admin | Updated: November 20, 2014 22:56 IST