वर्धा : जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.त्यातही वर्धा व देवळी बाजार समित्यांमध्ये भाजपाने प्रत्येकी १५ जागांवरच आपले उमेदवार उभे केले आहे. एका बाजुने खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे दुसऱ्या बाजुने माजी राज्यमंत्री आ. रणजित कांबळे व सहकार नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यात अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे. हेच चित्र सेलू बाजार समितीमध्येही बघायला मिळणार आहे. आर्वी व आष्टी-कारंजा बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येतील. आ. अमर काळे आणि माजी आमदार दादाराव केचे आपापल्या आघाडीची सूत्रे हलवीत आहे. येथे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना व स्थानिक अभद्र मित्र काँग्रेससोबत असल्यामुळे सामना नव्या वळणावर आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपची लाट होती. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर यात घसरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतरच्या काळात वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निमित्ताने भाजपची लाट ओसरली वा कायम आहे. हे बघायला मिळणार आहे. तर आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेतील यश बघता निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. या निवडणुकीतील मतदार ग्रामीण भागातील असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची ही रंगीत तालीमच ठरणार आहे.
राजकीय कस पणाला
By admin | Updated: June 27, 2015 02:46 IST