वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्त्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करीत जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरुच होते. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या मार्फत आर्थिक मदत देवून जिल्हा बँकेचे महाराष्ट्र सहकारी बँकेत विलीनीकरण करा व एक लाखावरील रकमेच्या थकबाकीदार कर्जदारांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश जिल्हा बँकेतील प्रशासनाला देवून अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, स्थानिक आमदार व जिल्हाधिकार्यांना वारंवार निवेदने सादर करुन पाठपुरावा केला होता. दरम्यान मध्यवर्ती बँकेला कुलूपही ठोकले होते. याबाबत मात्र शासन स्तरावर कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे इशार्यानुसार सदर आंदोलनाला सुरुवात केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. जोपर्यंत शासनस्तरावरुन जिल्हा बँकेबाबत निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(जिल्हा प्रतिनिधी) आंदोलनस्थळ गाठण्यासाठी नवे फंडे आंदोलनस्थळाला चोहोबाजूंनी पोलिसांनी घेरले होते. काहीजण सकाळीच पोहचले. मात्र उशिराने आलेल्या आंदोलकांना अडविल्याने ते काम असल्याचे सांगून थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून पोहचले. पोलीस आणि ठेवीदार आमने-सामने शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकार्यांकडे जावू न दिल्यामुळे आंदोलक ठेवीदार आणि पोलीस आमने-सामने आले होते. अखेर ठाणेदार बुराडे आणि काही आंदोलकांनी सामंजस्य दाखविल्याने तणाव शांत झाला. २ लाख ४0 हजार २२५ खातेदार रिझर्व बँकेने जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार गोठविल्यामुळे ठेवीदारांमध्ये रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २ लाख ४0 हजार २२५ खातेदार आहे. ३४३ कोटी ३९ लाख ३८ हजार अडकले जिल्हा बँकेतील जिल्ह्यातील खातेदारांच्या रकमा विड्रॉल होत नसल्यामुळे मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्हा बँकेत ३४३ कोटी ३९ लाख ३८ हजार रुपये अडकले असल्यामुळे खातेदार चिंतेत आहे.
जिल्हा बँकेतील आमच्या रकमा परत करा!
By admin | Updated: May 29, 2014 02:38 IST