दलाल हटवा : आम आदमी पार्टीची तक्रारहिंगणघाट : शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे. उलट दलालामार्फत गेल्यास हेच काम जलद होते, अशी तक्रार आम आदमी पक्षाने केली आहे. ही व्यवस्था दलालरहित करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.तहसील कार्यालयात दलालांचा शिरकाव झाल्याने व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. नवीन शिधापत्रिका बनविण्यासाठी वा नाव कमी-अधिक करण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. याबाबतच्या तक्रारी लक्षात घेत सामान्यांची कामे वेळेत व्हावीे, यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेऊन येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. सामान्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केरोसीन गरजेचे असते. सध्या पावसाळा असल्याने केरोसीनची गरज आणखी वाढते. जीवनावश्यक रॉकेल शासनमान्य विक्रेत्याकडून रेशनकार्डवर मिळते. यासाठी नागरिकांना रेशनकार्ड मिळणे गरजेचे आहे. शिधापत्रिका बनविण्यासाठी पुरवठा विभागात पाच-दहा चकरा माराव्या लागतात. शेवटी कंटाळून नागरिक दलालामार्फत जातात आणि तेव्ही जलद काम होते, हा अनुभव आहे. शासकीय नियमावलीनुसार रेशनकार्डसाठी अर्ज दिल्यानंतर सहा दिवसांत कार्ड मिळायला पाहिजे; पण तसे होत नाही. पुरवठा विभागात शिल्लक १०० ते १५० अर्जांवर त्वरित कारवाई करून निकाली काढावी व तेथील व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.राजीव गांधी जीवनदायी योजनेत राशनकार्ड आवश्यक केल्याने गरजू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठीही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना मनोज रूपारेल प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, संदेश थुल, सलमान रंगरेज, नरेंद्र चुंबडे, नरेंद्र पांढरे, राजू अरगले, मेंढे, अजय देवढे, भारत पवार व पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
शिधापत्रिकांची कामे जलदगतीने करा
By admin | Updated: July 9, 2015 02:15 IST