शहीदभूमीत रणनिती ठरविण्यासाठी पार पडली सभा आष्टी (शहीद): पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील जवळपास १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्था व राहणीमानावर चांगला परिणाम होईल. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार असल्याचे म्हणत पुलगाव-आर्वी-वरूड-आमला १०० कि़मी. रेल्वे मिशन म्हणून येत्या स्वातंत्र्यदिनापासून शहीद भूमीतून हे जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती येथील शहीद स्मारकात आयोजित सभेत उपस्थित मान्यवरांनी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मीरा येणुरकर, रेल्वे मिशनचे प्रा. प्रशांत सव्वालाखे, डॉ. रिपल राणे, साखरे, बाबाराव डाहाके, नगरपंचायत बांधकाम सभापती जयश्री मोकद्दम यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी अतिथींनी सविस्तर मार्गदर्शन केले. ब्रिटीशांनी १९१६ ला आर्वी परिसरातील कापूस व लोणी इंग्लडच्या मँचेस्टर येथे पाठविण्यासाठी रेल्वे सुरू केली होती. मग ती बंद का करण्यात आली, असा सवालही यावेळी करण्यात आला. यासाठी गावापासून दिल्लीपर्यंत लढा देण्याची गरज व्यक्त केली. भरत वणझारा यांनी भूमिका मांडताना सांगितले की, यवतमाळला माजी खासदार विजय दर्डा यांच्या अथक परिश्रमातून यवतमाळ रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव हे रामटेकचे खासदार होते म्हणून नरखेड रेल्वेलाईन झाली. याच धर्तीवर खा. रामदास तडस यांनी या रेल्वे मार्गाकरिता संसदेमध्ये आवाज उठविला आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जलआंदोलनात सर्वपक्षीय पुढकाराची गरज आहे. त्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक विजयकर, कमलाकर निंभोरकर, डॉ. राजेंद्र निखरा यांनी नियोजन संबंधी मार्गदर्शन केले. गौरव जाजू, डॉ. रिपल राणे यांनी पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे जनआंदोलन संविधानिक शांततामय वातावरणात करण्याबाबत भूमिका मांडली. सभेचे आयोजन अॅड. मनीष ठोंबरे, आवेश खान, निरज भार्गव यांनी केले होते. संचालन सुरेश काळपांडे यांनी केले तर आभार ठोंबरे यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे मिशनकरिता जनआंदोलन
By admin | Updated: August 10, 2016 00:33 IST