एटीएम व दुकानासह विठ्ठल मंदिरातील दानपेटीही फोडलीवर्धा : गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे एटीएम व दोन दुकाने फोडण्यात आली. याच दिवशी नदीकाठच्या विठ्ठल मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. या तिन्ही घटनांमध्ये जवळपास आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला तरी नागरिकांत दहशत पसरली आहे. जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कहर सुरू आहे. पवनार हे गाव नदीलगत असल्याने येथे गारठा जास्त अनुभवास मिळतो. त्यामुळे रात्री ८ नंतरच गावामध्ये निरव शांतता सध्या दिसत आहे. याचाच फायदा घेत ग्रामपंचायत जवळ असलेल्या एसबीआयचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यात त्यांना पूर्णत: यश आले नाही. केवळ डायव्हर्ट बॉक्समध्ये जमा झालेले दोन हजार रुपये चोरट्याने लंपास केले. त्यानंतर चोरट्याने त्यांचा मोर्चा ग्रामपंचायत परिसरातच असलेल्या संकुलातील दुकानाकडे वळविला. यातील प्रशांत चोंदे यांचे दुकान फोडून दुकानातील ५ हजार रुपये रोख चोरले. तसेच काही सामानाची नासधूसही केली. त्यानंतर चोंदे यांच्या दुकानाला लागूनच असलेल्या मनीष हिवरे यांचे दुकान फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा नदीकाठालगतच्या नंदी खेडा परिसराकडे वळविला. तेथील विठ्ठल मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. याच परिसरातील वरभे यांचा पानठेला फोडून तेथून दहा ते बारा सिगारेटची पाकिटे चोरली. एटीएम चोरीप्रकरणी सुबोध लाभे तर दुकानातील चोरी प्रकरणी चोंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध सेवाग्राम पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८०, ५११ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. शहरालगत असलेल्या या भागात एकाच रात्री चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.(शहर प्रतिनिधी)
चोरीच्या घटनांनी पवनार हादरले
By admin | Updated: January 12, 2015 22:56 IST