वर्धा : विविधा केंद्रात विविध कामांकरिता येत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना दलालांच्या हस्तक्षेपामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याचा भंडाफोड ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून करताच लक्ष इमारतीच्या आवारात असलेले दलाल बेपत्ता झाल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले; मात्र इमारतीच्या आत असलेले दलाल कायमच होते. या दलालांवर प्रशासनाची मेहरनजर असल्याची चर्चा विविधा केंद्राच्या आवारात सुरू होती. दहावी-बारावीचे निकाल लागताच उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्राची गरज भासते. ती पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांची विविधा केंद्रात आॅनलाईन अर्ज करण्याकरिता गर्दी वाढली आहे. याच संधीचा लाभ घेण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून तर त्याचे प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंतचा अलिखीत करार करण्याची पद्धत येथे रूढ झाली आहे. ही बाब ‘लोकमत’ने प्रशासनाच्या नजरेत आणून दिली. यावर कारवाईच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कॅमऱ्यात अद्याप एकही दलाल गवसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कॅमेऱ्यासमक्षच हा प्रकार सुरू असताना तो कॅमेऱ्यात कैद होणे क्रमप्राप्त आहे. असे असताना यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मग कॅमेऱ्यांची उठाठेव कशाकरिता, असा प्रश्न समोर येत आहे. केंद्रात सुरू असलेल्या या दलालांना प्रशासनातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने आपले काहीच बिघडत नाही, अशा अर्विभावात दलाल वागत आहे. यामुळेच कॅमेऱ्यासमोर टेबल लावून ते बसत आहेत. येथे येणाऱ्यांना थेट काय पाहिजे, याची विचारणा त्यांच्याकडून आहे. या कारणाने इमारतीच्या आत असलेले दलाल कायम आहे. ‘लोकमत’चे वृत्त झळकताच इमारतीच्या आवारातील दलालांनी पलायन केले. आतील दलाल हे येथील अधिकाऱ्यांशी असलेल्या आर्थिकसंबंधामुळे कायम आहेत, असेही बोलले जात आहे.(प्रतिनिधी)
बाहेरचे बेपत्ता, आतल्यांवर मात्र मेहरनजर
By admin | Updated: June 27, 2015 02:44 IST