चर्धा : येथील रूपेश मुळे याचा नरबळी आतापर्यंत झालेल्या नरबळीच्या तुलनेत वेगळाच आहे. त्याचा केवळ नरबळी नाही तर आरोपीने केलेले हे अघोरी कृत्य आहे. आजवरच्या प्रकरणात डोळे खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचे आश्चर्यही अंनिसचे संस्थापक संघटक व राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी वर्धेत पत्रपरिषदेत व्यक्त केले.वर्धेत झालेल्या रूपेश मुळे नरबळी प्रकरणाची माहिती घेण्याकरिता ते रविवारी वर्धेत आले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची भेट घेवून प्रकरणाची माहिती घेतली. यानंतर त्यांनी रूपेशची गळा आवळून हत्या केली ते ठिकाण व त्याचा मृतदेह सापडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. सोबतच रूपेशच्या आई वडिलांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून त्यांनी या प्रकरणात आरोपी आसिफ शहा हा एकटा नसून यात आणखी आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला. शिवाय पोलिसांनी या दृष्टीने तपास करण्याची मागणी केली. पत्रपरिषदेत त्यांनी जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
नरबळीच नाही तर अघोरी कृत्य
By admin | Updated: November 16, 2014 23:09 IST