वर्धा : नैसर्गिक शेती उत्पादनांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शेतकर्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेवून थेट ग्राहकांपर्यंत पोहचावे, असे आवाहन करताना दर्जेदार उत्पादनाची परंपरा जिल्ह्याने निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सोना बोलत होते. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या महोत्सवात होणार असून २८ मे पर्यंत वर्धेकरांना धान्य तसेच शेतमाल माफक दरात उपलब्ध होणार आहे. धान्य महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेंद्रीय उत्पादनाची मागणी व भाविष्यातील बाजारपेठ व शेतकर्यांनी उत्पादन घेण्याचे आवाहन करतान सोना म्हणाले की, कमीत कमी प्रक्रिया झालेल्या धान्याची जगात मागणी आहे. जिल्ह्याने दर्जेदार उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण करावी तसेच विविध उत्पादनावर प्रक्रिया करणारे कुटीर उद्योग सुरू करावे. प्रारंभी जिल्ह्यातील विविध प्रगतीशील शेतकरी, महिला बचतगट, कुटीर उद्योग आदींनी गहू, ज्वारी, शेंगदाना, पपई, चिकू, आंबा, हळद आदी विविध उत्पादने या धान्य महोत्सवात वर्धेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. शेतकर्यांनी तयार केलेली तुरीची दाळ ग्राहकांसाठी अत्यंत अल्प दरात या महोत्सवाचे माध्यमातून उपलब्ध झाली आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी धान्य महोत्सवाचे उद्घाटन केले व शेतकर्यांनी धान्य महोत्सवात आणलेल्या विविध उत्पादनांची माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बºहाटे यांनी स्वागत करून धान्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी देवळी येथील सतीश दाणी यांचा ऋषीकेश या मुलाला दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालक दीपक पटे, जिल्हा कृषी अधिकारी आर.के. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एम. शिंदे, अरुण पलसाने, हुमने तंत्र अधिकारी चनशेट्टी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी केले तर आभार रमेश शिंदे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
ंदर्जेदार उत्पादनाची परंपरा निर्माण करण्याची गरज
By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST