मुलाखत : मुलचंद बडजाते यांची माहिती
वर्धा : आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून आयुर्मर्यादा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते़ संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या सुदृढ आरोग्याची पुंजी आहे़ हा मूलमंत्र महात्मा गांधी यांच्याकडून मिळाला. गांधीजींनी निसर्गाेपचारावर व्यापक काम केले आहे़ हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे़ बदलते जीवनमान आणि ऋतूमान पाहता प्राकृतिक चिकित्सा ही काळाची गरज ठरत आहे, विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मुलचंद बडजाते यांनी व्यक्त केले़ जिल्ह्यात बडजाते यांनी निसर्गोपचार क्षेत्रात केलेले कार्यच त्यांची ओळख बनले आहे़ वय वर्षे ८९ असताना त्यांची ठणठणीत असणार्या तब्बेतीचे गुढ याच आदर्श जीवनशैलीत आहे़ गांधी विचारांचे समर्थक असणारे मुलचंद बडजाते यांच्याशी केलेल्या संवादात त्यांनी स्वातंत्र समर काळातील घटनांपासून ते भूदान चळवळ, कृष्ठरूग्णांकरिता विनोबांचे कार्य, सेंद्रीय शेती, गोधन यासर्व घटनांच्या स्मृती जागृत केल्या. या संवादातून त्यांचा जीवनपटही उलगडत गेला़ महात्मा गांधी १९३३ ला वर्धेत आले़ त्यावेळी मुलचंदजींचे शालेय शिक्षण सुरू होते़ त्यांचे काका चिरंजीलाल बडजाते जमनालाल बजाज यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असत़ किशोरवयातच मुलचंदजींची महात्मा गांधींचे कार्य जवळून पाहिले़ हेच संस्कार त्यांच्यावर होवून राष्ट्रभक्तीचे बीज रूजले़ याविषयी सांगताना ते म्हणतात, गांधीजींसोबत जंगल सत्याग्रहात भाग घेतला़ यादरम्यान ‘आरोग्यकी पुंजी’(की टू हेल्थ) हे पुस्तक वाचण्यात आले़ यातूनच आदर्श जीवनमानाचा मार्ग सापडला़ पुस्तकात निसर्गोपचार पद्धती सांगितल्या आहे़ त्याचा संगम स्वत:च्या जीवनात केला आणि प्रचार व प्रसार केला़ सुदृढ आरोग्याचे तेच रहस्य आहे़ पिढीजात कापड व्यवसाय करताना आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही़ नियमित योग प्राणायाम केल्यास व्याधींमुक्त जीवन जगता येत असल्याचे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)