पुलगाव : राज्य शासनाने १३८ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे; पण यात नाचणगावचा समावेश करण्यात आलेला नाही़ यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेले भोसलेकालीन वैभवाची साक्ष देणारे नाचणगाव अद्यापही उपेक्षितच राहिले आहे़ या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ राजकीयदृष्ट्या संवेदनशील, जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत, विस्तीर्ण क्षेत्र, राष्ट्रीय महामार्गावर वसलेले सुमारे २५ हजार लोकसंख्येचे नाचणगाव शासनाच्या वक्रदृष्टीमुळे आजपर्यंत उपेक्षित आहे़ विकासाचे स्वप्न उराशी बाळगून असलेले ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पालिकेत होणार म्हणून प्रतीक्षेत आहे़ राज्य शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये राज्यातील १३८ गावांतील ग्रामपंचायत नगर परिषदमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. यात जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, सेलू व समुद्रपूर या गावांचा समावेश करण्यात आला; पण १७ सदस्यीय ग्रामपंचायत, शहरी लोकसंख्येची बरोबरी करणारे, जवळपास ७० ते ८० ले-आऊट असलेले नाचणगाव कित्येक वर्षांपासून उपेक्षितच राहिले आहे.गावात येण्यासाठी गल्ली-बोळातून खाचा-खळग्यांनी व्यापलेला मुख्य रस्ता, विद्युत उपकेंद्राचा अभाव, गुंजखेडा पाणी पुरवठा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आदी समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जाव लागत आहे़ विकासात्मक बाबीसाठी स्वतंत्र विकास निधी नाही, लोकप्रतिनिधी वा जि.प. कडून मिळणाऱ्या निधीतूनच काय तो ग्रामविकास होतो़ यामुळे गावात अनेक समस्या निर्माण होतात.आर्थिक कोंडीमुळे गावात आवश्यक सार्वजनिक शौचालय बांधता येत नाही. विकासात्मक स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या ग्रामस्थांच्या मागणीला बगल देत राज्य शासनाने १३८ गावांच्या यादीतून नाचणगाव बाद केले. भोसलेकालीन वैभवाची साक्ष देणारी वर्धा जिल्ह्यात सर्वात मोठी नाचणगाव ग्रा़पं़ उपेक्षितच राहणार काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात़(तालुका प्रतिनिधी)
भोसलेकालीन वैभवप्राप्त नाचणगाव उपेक्षितच
By admin | Updated: January 12, 2015 22:57 IST