हिंगणघाट : गत एक आठवड्यात येथे पाच दिवसाच्या अंतरात दोन कथित आत्महत्या झाल्या. या दोन्ही आत्महत्या की हत्या याबाबत गुढ उकलण्यात पोलीस मात्र अद्याप अपयशी ठरले आहे. या दोन्ही घटना पोलिसांकरिता आव्हान देणाऱ्या ठरत आहेत.येथील भारत दिनांत विद्यालयाच्या अनिल गुलाबराव भोस्कर (४५) यांनी शाळेत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २८ आॅक्टोबर २०१४ ला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात मृतकाच्या पत्नीने संस्था चालकावर आरोप लावून चौकशीची मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली. त्याची शाई वाळण्यापूर्वीच भारत विद्यालयाची दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी रेणुका आनंदा महतो ही बेपत्ता झाली. तिचा शोध लावण्यापूर्वीच ५ नोव्हेंबरला नांदगावच्या नदी घाटावरील पाण्यात तिचा मृतदेह आढळला. दोन्ही प्रकरणात प्रथमदर्शनी आत्महत्या दिसून येत असली तरी त्यांच्या मृत्यूचे गुढ मात्र अद्याप कायम आहे. मृतक अनिल भोस्कर यांनी घटनेच्या रात्री शाळेत चौकीदारी केली. सकाळी घरी पोहचून दिनचर्या आटोपून ९ वाजता सकाळचा न्याहारीही केली. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. केवळ फोन आला म्हणून शाळेत जात असल्याचे घरी सांगत शाळा गाठली. आणि अर्ध्या तासातच त्यांचा मृतदेह फासावर लटकलेला आढळून आला. तर मृतक रेणुका महतो नेहमी प्रमाणे ती सकाळी ६ वाजता शिकवणीसाठी घरून निघाली; परंतु ती नित्याप्रमाणे घरी पोहचली नाही. काही तासातच तिची सायकल व दप्तर वणा नदीच्या पुलावर आढळले. ती मात्र बेपत्ता होती.या दोन्ही मृतकांची मृत्यूपूर्वीची वागणूक नित्याप्रमाणेच असल्याचे कुटुंंबीयांचे म्हणणे आहे. अवघ्या पाच दिवसातील दोन्ही मृत्यू संशयस्पद ठरत आहेत. याचे गुढ उकलण्यासाठी पोलिसांची विशेष प्रगती नाही. सदर प्रकरण आत्महत्या म्हणून बंद न करता त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी जनमाणसात जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ दोन्ही मृत्यूचे गूढ अद्याप कायमच
By admin | Updated: November 8, 2014 22:41 IST