बँकेचा निर्णय : ग्रामीण खातेदार दुरावणार अरविंद काकडे - आकोलीआर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत कानावर येत असताना बँकेच्या बारा शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी धक्कादायक ठरणारा आहे.सहकाराला ग्रामीण भागापर्यंत पोहचावे या हेतूने ग्रामीण भागात बँकेच्या शाखा उघडण्यात आल्या होत्या. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फतच शेतकऱ्यांना पतपुरवठा याच शाखांतून होत होता. विजेचे बिल, भरण्याची सुविधा होती. शिक्षकांचे वेतन व ग्रामपंचायतींचे व्यवहारही याच शाखांमधून व्हायचे. त्यामुळे बँकांशी शेतकरी, शेतमजुरांची नाळ घट्ट झाली होती. राज्य शासनाने पॅकेज घोषित केल्यामुळे नव्याने या सुविधांचा लाभ घेता येईल. ही आशा पल्लवीत झाली. असे असताना ग्रामीण भागाशी जुळलेल्या शाखांचे होणारे विलीकरण ग्रामीण खातेदारांत दुरावा निर्माण करणारे आहे.१२ जुलै पासून दिनकरनगर शाखा सेलू शाखेत, ठाणेगाव आणि कन्नमवारग्राम शाखा कारंजा शाखेत, सुतगिरणी शाखा महिला आश्रम वर्धा शाखेत, वायफड शाखा वर्धा शाखेत, मदनी सेवाग्राम शाखेत, कोरा नंदोरी शाखेत, पोहणा शाखा वडनेर शाखेत, तळेगाव(टा.) वायगाव शाखेत, विजयगोपाल शाखा पुलगाव शाखेत, रसुलाबाद शाखा पुलगाव शाखेत आणि पिंपळखुटा शाखा आर्वी शाखेत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शाखांचे कर्मचारी सुद्धा यथावकाश त्या-त्या शाखांमध्ये कर्तव्यावर रूजू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार नसल्याने बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र या बँकेत असलेल्या खातेदारांच्या पैशाकरिता मात्र त्यांना ज्या शाखेत त्यांची बँक विलीन झाली त्या बँकेत जावून पैसे आणण्याकरिता चकरा माराच्या लागणार आहे. बँक विलिनीकरणाचा लाभ बँकेला होत असला तरी त्याचा खरा फटका बँकेतील खातेदांना बसणार असल्याचे वास्तव आहे.
सहकारी बँकेच्या बारा शाखांचे विलिनीकरण
By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST