वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बाबत येथील वरिष्ठांना नेहमी विचारणा केली असता त्यांच्याकडून केवभ वरिष्ठांना कळविले आहे, असेच उत्तर मिळते. विविध विभागाचे तज्ज्ञ येथे नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार होणे शक्य होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी येथे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांनी केली आहे. सामान्य रुग्णालयात जनरल सर्जनच्या दोन जागा आहेत. या दोनही जागा रिक्त असल्याने रुग्णांना अडचणी सहन कराव्या लागत आहे. शिवाय इतर विभागाचे तज्ज्ञ अधिकारीही नाही. याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. याकडे वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता शासनाच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. येथे कोट्यवधी रुपये खर्च करून सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मात्र त्याचा कुठलाही उपयोग येथे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णाला होत नसल्याचे समोर येत आहे. केवळ तंत्रज्ञ नसल्याने येथे असलेल्या सुविधा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यातच नव्हे सर्वत्र विविध नवनवे रोग समोर येत आहे. अशा काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिकाऱ्यांची असलेली कमतरता रुग्णांकरिता धोक्याची ठरत आहे. यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी जोर धरत आहे.(प्रतिनिधी)
जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा
By admin | Updated: February 16, 2015 01:40 IST