न्यायालयाकडून ठपका : चौकशी होईपर्यंत व्यापारी व अडते मतदार संघाची निवडणूक रद्दआर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या महिन्यात होऊ घातली आहे. यातील व्यापारी व अडते मतदार संघातील १२२ मतदारांची नावे बोगस असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला आहे. चौकशी होईपर्यंत या दोन जागांची निवडणूक रद्द करण्याचे न्यायालयाने निर्गमित केलेल्या आदेशात नमूद असल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी मतदार संघाची मतदार यादी जिल्हा उपनिबंधकांनी प्रसिद्ध केली होती. यात २२४ पैकी १२२ मतदारांची नावे बोगस असल्याचा आक्षेप घेण्यात आला. या बोगस मतदार यादीत बाजार समितीत कुठल्याही प्रकारचे व्यवहार केले नसताना त्यांना बनावट मतदानासाठी दरवर्षी परवाने देण्यात येत होते. यावर तक्रार दाखल केल्यावरही जिल्हा उपनिबंधकांनी तक्रारीची योग्य दखल न घेता आक्षेपकर्ता नगरसेवक संजय थोरात यांचा अर्ज खारीज केला. याविरूद्ध थोरात यांनी उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत जिल्हा उपनिबंधकांना बोगस असलेल्या १२२ मतदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले. ही तपासणी झाल्यानंतरच व्यापारी व अडते मतदारसंघाची निवडणूक घ्यावी, असे आदेश न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार दादाराव केचे यांनी पत्रपरिषदेत न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली.(तालुका प्रतिनिधी)
बाजार समिती निवडणूक; यादीत १२२ बोगस मतदार
By admin | Updated: June 28, 2015 02:37 IST