वाहतूक पोलिसांची दहशत : दुचाकी घरी ठेवून आॅटोने प्रवासआकोली : शहरी युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते. अधिक रकमेच्या चालाणची भीती दाखवून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून अवैध वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, आॅटो सोडून दुचाकी चालकांवरच अधिक कारवाई होताना दिसते. यामुळे ग्रामीण नागरिक दुचाकी घरी ठेवून आॅटोने भुर्दंड सोसत शहरात जात असल्याचे दिसते.वाहनांचे लोन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. दारासमोर बैलजोडी दिसणार नाही; पण दुचाकी हमखास दिसते, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक घरी दुचाकी असल्याचे दिसते. वाहतूक सोईची व्हावी म्हणून वाहनांचा वापर वाढत असला तरी वाहन चालकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरी मोटारसायकल असताना आॅटोने प्रवास करताना दिसतात. शहरात कोणत्याही रस्त्याने गेले तरी वाहतूक पोलीस शिपाई ग्रामीण नागरिकांना अडवितात. या प्रकारामुळे अनेक युवक त्रस्त झाले आहेत. कागदपत्राची चौकशी करताना एखादा कागद नसला तरी त्याला १२०० रुपयांची चालाण फाडावी लागेल, असे सांगून २०० ते ५०० रुपये घेत सोडले जात असल्याचे ग्रामीण युवक सांगतात. दुसरीकडे शहरी युवक वाहतूक भरधाव जात असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसते. वाहतूक शाखेतील काहींमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत वाहतूक पोलिसांच्या कारवायांना आवर घालावा, अशी मागणी ग्रामीण वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)शेतमाल आणणाऱ्या वाहनांवरही कारवाईसध्या सोयाबीन, कापूस हा शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते; पण वाहतूक शाखेच्या दडपशाहीला वाहनचालक कंटाळले आहेत. दररोज शहरात जावे लागत असल्याने चालाण न घेता पैसे उकळले जात असल्याचे वाहन चालक सांगतात. गाडी ओव्हरलोड आहे, वजन करावे लागेल, अडीच हजारांची चालाण घे, अशा स्वरूपाच्या धमक्या देत अधिकाधिक रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून पैसे उकळण्याकरिता, असा संतप्त सवाल ग्रामीण युवक उपस्थित करीत आहेत. यापूर्वी वर्धा कृषभ उत्पन्न बाजार समिती प्रशासनानेही वाहतूक पोलिसांबाबत अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पॉर्इंट सोडून भलतीकडेच शिपाई फिरताना दिसतात, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
चालानच्या नावावर ग्रामीण वाहनचालकांची लूट
By admin | Updated: November 15, 2015 01:33 IST