शेतकऱ्यांना चिंता : अधिवेशनाकडे लक्षवायगाव (नि.) : शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यातच रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणी करावी की उधारी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्रासह राज्यात सत्तापरिवर्तन झाले असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असल्याचे दुदैैवी चित्र आहे. शेतीवर संपूर्ण जिवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा अवकृपा होत आहे. यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे चांगला पगार असलेले संघटीत सरकारी कर्मचारी पगार वाढीसाठी आंदोलने करत असतात. मात्र जगाचा पोशिंदा आपला घाम गाळून पिकविलेल्या मालाला वाजवी भाव मिळावा याकरिता सरकारकडे आशेने बघत आहे. शासनाकडून काही मदत मिळाली तर त्याचा आधार होईल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. खरीपाच्या हंगामात या वर्षी शेतकऱ्यांना नापिकीच्या सामना करावा लागला. यात सोयाबीन पूर्णत: गेले. कपाशीची आशा होती मात्र पाण्याअभावी वाढ खुंटली व पऱ्हाटीवर लाल्याने थैमान घातले. त्यातच कापसाला अत्यल्प भाव मिळत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल झालेल्या शेतकरी रब्बीच्या पिकाकडे आशा लावून आहे. खरीपाच्या तोंडावर घेतलेली उधारीची चिंता मुलांचे शिक्षण, आजार, घरखर्च व आता रब्बीची सुरू झालेली पेरणी यामुळे चिंतेत अधिकच भर पडली. आहे. कापसाला गत वर्षापेक्षाही राज्यशासनाने कमी हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांची पूर्णत: निराशाच झाली आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असल्याने भावात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु रबी हंगाम सुरू झाला असतानाही हाती पैसा नसल्याने उधारी द्यावी की रबीची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.(वार्ताहर)
उधारी द्यावी की, रब्बीची पेरणी करावी
By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST