आमच्याकडे आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे सुरू आहे. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे असलेले काम ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. - भीमराव नांदणे, प्रभारी उपअधीक्षक भूमि अभिलेख, आर्वी. आर्वी : शेतकऱ्यांना सशक्त व संपन्न करण्यासाठी पारदर्शक प्रशासन राबवून जलयुक्त शिवार, राजस्व अभियानासारख्या शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जात आहे. यातच भूमी अभिलेख कार्यालयात मात्र शेतकऱ्यांना एका कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागत असल्याचे दिसते. यामुळे भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात असल्याचेच दिसते. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी असलेल्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून प्रक्रिया पार पाडावी लागते. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीची कित्येक प्रकरणे प्रलंबित आहे. भूमिअभिलेख विभागातील उपविभागीय अधिकारी शेतीविषयक कामांना प्राधान्य न देता नगदी मिळणाऱ्या कामांवर लक्ष देत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. महत्त्वाच्या दिवशीही कार्यालयात दुपारनंतर सुकसुकाट असतो. लहान -सहान कामासाठीही नागरिकांना नाहक त्रास दिला जात असून साध्या पीआर कार्डसाठीही पैसे मोजावे लागत आहेत. एकंदरीत भूमिअभिलेख कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अधिकारी व कर्मचारी कामात असल्याचे भासवित असून मोबाईलवर व्यस्त दिसतात. शेतकऱ्यांच्या शेतांची मोजणी करण्यासाठी भूमापकांची संख्या कमी असल्याचे कारण दाखवून प्रलंबित प्रकरणे कार्यालयात धूळखात पडलेली आहेत. पालकमंत्री राजस्व व जलयुक्त शिवार अभियानातून शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जाते; पण भूमिअभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार रोखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पैसे घेऊन काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)
भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात
By admin | Updated: May 1, 2017 00:35 IST