बिमला नेगी-देऊस्कर : परिसंवादात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनवर्धा : ध्येय ठरविल्याशिवाय यश मिळत नाही. यशप्राप्तीसाठी सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक सक्षमता व इच्छा शक्तीच्या जोरावरच आपण कठीणातील कठीण ध्येय गाठू शकतो, असा आत्मविश्वास गिर्यारोहक बिमल नेगी-देऊस्कर यांनी आपल्या उत्तराखंडमधील गिर्यारोहणाच्या अनुभवन कथनातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केला. विकास भवन येथे ‘नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकुल परिस्थितीत ध्येय गाठताना स्वीकारावयाची आव्हाने’, या विषयावरील परिसंवादात त्यांनी अनुभव कथन केले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अविनाश देऊस्कर यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नेगी यांनी गिर्यारोहण करताना नियोजन, जोखीम, योग्य आणि वेळेत निर्णय, सहनशीलता आणि समाजसेवेचे भान यावर उत्तराखंडमध्ये झालेल्या हानी आणि केदारनाथ, हरसाल या ठिकाणी आलेला गिर्यारोहणाचा अनुभव यावेळी पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सर्वांसमक्ष मांडला. वर्धेतील आंजी येथे त्यांची संस्था साहसी खेळ, गिर्यारोहण यावर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देते, असेही त्यांनी सांगितले. पर्वतच त्यांना जगण्याची आणि आयुष्याला उभारी देतात. त्यामुळे प्रत्येकाने हिमालय पहावा, अनुभवावा. केदारनाथ दुर्घटनेच्या प्रसंगी त्यांनी केलेल्या सक्षम नेतृत्व आणि सुक्ष्म नियोजन, अचूक निर्णयामुळे भाविकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासही मदत झाल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त बिमला नेगी यांच्या साहसी वाटचालीची माहिती दिली. त्यांनी एव्हरेस्ट, पर्वतारोहण एक्सपिडीशनमध्ये केल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारतर्फे पहिला नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड १९९४ मध्ये त्यांना देण्यात आला. अॅडव्हेंचर स्पोर्टसमध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारतर्फे अर्जुन अवॉर्ड, गिर्यारोहण क्षेत्रासोबतच महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी तसेच विविध क्षेत्रात महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. समाजातील अतिमागास तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांचे अविरतपणे कार्य सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील ३५ आदिवासी गावांमध्ये असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास तसेच दारिद्रय रेषेखाली असलेल्यांसाठी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासोबतच अनाथ मुले तसेच दिव्यांगांसाठी बिमला नेगी विशेष कार्यक्रम राबवित आहेत. प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या हस्ते बिमला नेगी, भारती, अविनाश देऊस्कर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसनही यावेळी नेगी यांनी केले.(प्रतिनिधी)
मानसिक, शारीरिक सक्षमतेनेच ध्येय गाठणे शक्य
By admin | Updated: January 10, 2016 02:34 IST