टाकरखेड : शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे डिमांडचा भरणा केला; परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटला तरीही त्यांना जोडणी मिळाली नाही. यामुळे ओलीताची सोय असतानाही कोरवाहू शेती करण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे.सिंचनासाठी असणाऱ्या विहिरी केवळ विद्युत पुरवठ्याअभावी कुचकामी ठरत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ व्हावा म्हणून सन २००९ मध्ये प्रत्येक तालुक्यात एक हजार विहिरी शंभर टक्के अनुदानावर खोदून देण्याचा धडक कार्यक्रम सुरू केला. या योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा शासनाचा प्रयत्न होता. अनेक लाभार्थ्यांनी एका लाखाच्या अनुदानातून तयार होण्याऱ्या विहिरींना आपल्या जवळची रक्कम खर्च करून पूर्ण केल्या. विहिरींना भरपूर पाणी लागले. या विशेष योजनेतील विहिरींना तातडीने वीज पुरवठा दिला जाईल असे फर्मान शासनाने सोडले होते. या विहिरीच्या करारनाम्यासोबत वीज जोडणी अर्जसुद्धा लावला होता.डिमांडची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले; पण दोन वर्षे लोटली तरीही वीज जोडणीचा पत्ता नाही. संबंधित विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या अनेक चकरा सुरू असून उडवाउडवीचे उत्तरे मिळते. यादी यायची आहे तर कधी कंत्राटदाराकडे काम दिले आहे. एकूणच कंपनीला शेतकऱ्यांचे काहीही घेणे देणे नसून वीज कंपनी केवळ वेळकाढू धोरण अवलंबित आहे. परिसरातील वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे. आता उन्हाळा संपला पावसाळा लागला. त्यामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)
वीज पुरवठ्याअभावी सिंचन विहिरी कुचकामी
By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST