विजय माहुरे सेलूतालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या घेऊन कर्मचारी पाटबंधारे विभागाकडे जात आहेत; पण त्यांच्याकडे कर्मचारीच नसल्याने त्या सोडविणे कठीण झाले आहे. या विभागात १२३ पदे मंजूर असताना केवळ ३५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण धूरा आहे. तब्बल ८८ पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. सेलू तालुक्यातील बोरधरणपासून असलेला मुख्य कालवा समुद्रपूर तालुक्यातील बाबापूर पर्यंत गेला आहे. या कालव्याचे अंतर २० कि.मी आहे. तर ९४ मायनर असलेला कालवा व वितरीका पाहता २१७ कि.मी चे अंतर आहे. या सर्व वितरीकांची साफसफाई व दुरुस्ती करण्याकरिता ३० लाख रुपयांची गरज आहे. मात्र रबी हंगामासाठी कालवा वितरिकांद्वारे प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर शेतकऱ्यांन्कडून सेलूच्या संबंधित कार्यालयात समस्याचा डोंगर उभा केला आहे. शेतकऱ्यांना अधिकारी समजावून सांगत असले तरी निवेदनाचा खच आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालवे चौकीदाराची उणीव भासत आहे. बोरधरण शाखेत १, अंतरगाव शाखेत १, केळझर शाखेत १, दहेगाव १ व हिंगणी शाखेत १ असे ४ कालवे चौकीदारावर कारभार सुरू आहे. पाटबंधारे उपविभाग सेलू अंतर्गत बोरधरण, अंतरगाव, केळझर, दहेगाव व हिंगणी शाखेत कर्मचाऱ्याची कमतरता आहे. त्यात उपविभाग सेलू येथे १३ मंजूर पदे असून दोन रिक्त आहे. बोरधरण शाखेत २२ कर्मचाऱ्याची आवश्यकता असताना ५ कर्मचारी आहेत तर १७ पदे रिक्त आहेत, अंतरगाव शाखेत २२ पैकी १८ पदे रिक्त, केळझर २२ पैकी १८ रिक्त, दहेगाव २२ पैकी ४ कार्यरत तर हिंगणी शाखेत २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत.कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात पाटबंधारे विभागाला अपयश येत आहे. या विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी जोर धरत आहे.
पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Updated: November 18, 2015 02:13 IST