दणका लोकमतचावर्धा : साहेब आम्ही इथे राहत आहोत, तुम्ही चार महिने राहून पहा... चार किलोमिटरवरून पाणी आणून पहा.. असे म्हणत नटाळा पुनर्वसन येथील नागरिकांनी सुविधांची पाहणी करण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांच्या चमूवर गुरुवारी प्रश्नांचा भडीमार केला. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ ठरलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या तसेच त्यांच्यासह आलेल्या जि.प. बांधकाम विभाग व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. पुनर्वसन झालेल्या या गावात कागदावर पूर्णच सुविधा असल्याचे दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी खडतर रस्त्याने फिरवित पाण्याची नसलेली सोय, अर्धवट असलेल्या नाल्या, शाळेची दुरवस्था, खांबावर नसलेले पथदिवे, समाज भवनाची झालेली दुरवस्था दाखवित मूलभूत सुविधा दाखविण्याचे आव्हानच दिले. गावात पाहणी करून आलेल्या अधिकाऱ्यांनी कागदावर दाखविलेली एकही सुविधा दिसली नसल्याने त्यांचीच बोलती बंद झाली. पाहणी करून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गावकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही पाहणी करण्याकरिता आलो, केवळ हेच वाक्य अधिकाऱ्यांच्या मुखातून ऐकू येत होते. पाहणी करण्याकरिता आलेल्या या चमूत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता सुहास भोमले, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता व्ही. डी. मोकादम, उपविभागीय अभियंता डी. अयंगारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी समर्थ यांचा समावेश होता. वास्तविक, ज्या अधिकाऱ्यांना पाहणी करायचे होते. त्यांनी यातून काढता पाय घेतल्याची यावेळी चर्चा होती.सुकळी प्रकल्पात गेलेल्या नटाळा या गावाचे पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीत २००९ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. या गावात १८ नागरी सुविधा देण्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. असे असताना गावात सुविधा दिल्याचे सांगत लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला कुठलीही सूचना न देता परस्पर गावाचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला केले. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आंदोलन पुकारले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हस्तातरणाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. हेच अधिकारी गावात आज पाहणी करण्याकरिता आले असता त्यांच्या उत्तरावर त्यांचाच ताबा नव्हता. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्याच कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्राच्या प्रती दाखवित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. पत्र पाहताच उपस्थित अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल वरिष्ठांसमक्ष ठेवून त्यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार सुविधा देण्यात येईल, असे गावकऱ्यांना सांगितले. हे उत्तर ऐकताच उपस्थित नागरिकांनी मग कागदारवर दिलेल्या सुविधा केव्हा दिल्या, असा प्रतिप्रश्न केला. आता पुन्हा कोणत्या सुविधा देणार, असा प्रश्न करताच अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.आज गावाच्या समस्या निकाली काढायच्याच या इराद्याने जमलेल्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना शाळेच्या प्रांगणातच रोखले. त्यांना चर्चा करण्याची विनंती केली; मात्र पाहणीच्या नावावर आलेल्या या अधिकाऱ्यांनी चर्चेची मागणी धुडकावली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना तिथेच रोेखून धरले. यावेळी गावकऱ्यांनी आजच्या आज पाण्याची सुविधा करा, असे म्हणत त्यांच्या गाड्या अडविल्या. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अयंगारी यांनी आज सायंकाळी गावात पाण्याचे टँकर येईल, असे आश्वासन दिले. यावर गावकऱ्यांनी टँकर एकच दिवस राहील वा रोजच येईल असे विचारताच अधिकाऱ्यांनी पुन्हा चुप्पी साधली. यामुळे गावकऱ्यांनी कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी केली. पाण्याची समस्या मार्गी निघाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच गावाचे अवैधरित्या हस्तांतरण करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह ग्रामपंचायतीला भरलेला कर रद्द करून परत करण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना येथून हलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. अखेर गावात शुक्रवारी बैठक घेवून या विषयावर चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.(प्रतिनिधी) गावकऱ्यांनी अडविल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या गावात सुविधांची पाहणी करण्याकरिता अधिकाऱ्यांची चमू त्यांच्या विभागाच्या तीन जीपमधून आली होती. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न देता व केलेली चर्चेची मागणी फेटाळताच गावकरी संतापले. यावेळी गावातून काढता पाय घेण्याच्या तयारीत असलेले अधिकारी गाडीत बसताच गावकऱ्यांनी त्यांच्या गाड्या अडवून धरल्या. युवकांसह महिलांनीही गाड्यांसमोर मुलांसह बसल्या होत्या. अधिकारी झाडाखाली, बाबूने केली पाहणीगावात सुविधांची पाहणी करण्याकरिता आलेले अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात असलेल्या झाडाखाली सावलीत उभे होते, तर त्यांच्या सोबत आलेले बाबू पाहणी करीत असल्याचे समोर आले. पाहणी करणाऱ्यांना गावात पहिले पाण्याची सुविधा द्या, असा प्रश्न गावातील महिलांनी करताच त्यांनी ‘आम्ही बाबू आहोत, फक्त लिखापडी करू, साहेब तिकडे आहेत त्यांना विचारा’, असे उत्तर दिल्याने गावकरी आणखीच संतापले.
पाहणी चमूची उडाली भंबेरी
By admin | Updated: February 13, 2015 00:27 IST